फळबागा वाचविण्यासाठी शासनाला साकडे
By Admin | Updated: July 9, 2015 00:18 IST2015-07-09T00:18:46+5:302015-07-09T00:18:46+5:30
राजेश खराडे , बीड मध्यंतरीच्या अवकाळीने व आताच्या पावसाच्या ओढीने जिल्ह्यातील फळबागा धोक्यात आल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने अद्यापपर्यंत

फळबागा वाचविण्यासाठी शासनाला साकडे
राजेश खराडे , बीड
मध्यंतरीच्या अवकाळीने व आताच्या पावसाच्या ओढीने जिल्ह्यातील फळबागा धोक्यात आल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने अद्यापपर्यंत ३ कोटी ९८ लाख रूपयांचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना देखील मदत मिळवून देण्याकरिता कृषी विभागाने प्रशासनाकडे साकडे घातले असून, ५ कोटी ६० लाख रूपयांची मागणी केली आहे.
मध्यंतरीचा अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका आष्टी तालुक्यातील फळबागायतदारांना बसला होता. त्यामुळे हजारो हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले होते. यामुळे फळबागा संकटात सापडल्या होत्या. यामधूनही बचाव होण्याकरिता शेतकऱ्यांनी प्रशासकीय मदतीची मागणी केली होती. त्याचा पाठपुरावा करून येथील कृषी विभागाने ३ कोटी ९८ लाख रूपयांचे वाटप केले असल्याचे कृषी उपसंचालक बी. एम. गायकवाड यांनी सांगितले. वाटप केलेल्या रकमेत ३६४५ हेक्टरावर फळबागा आहेत. जिल्ह्यातील सुमारे ५८४० फळबागायतदारांना याचा अद्याप लाभ भेटला आहे. तरी जिल्ह्यातील सुमारे ७२६६ शेतकरी मदतीविनाच आहेत. त्यामुळे ४५३९ हेक्टवरील फळबागांवर धोक्याची घंटा आहे.
फळबागा जगविण्यासाठी छाटणी, पीक संरक्षण, पुनर्जीवन, कीड व्यवस्थापन करण्यासाठी ही रक्कम देण्यात आली आहे. जिल्ह्यातील फळबागांचे नुकसान पाहता कृषी विभागाने १० कोटी रूपयांची मागणी केली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ३ कोटी ९८ लाख रूपये उपलब्ध झाले होते. उर्वरित ७२६६ फळबागायतदारांकरिता वरिष्ठांकडे मागणी करण्यात आली आहे.