भक्तिभावाचे मंगलमय सूर
By Admin | Updated: July 10, 2014 01:15 IST2014-07-10T00:57:44+5:302014-07-10T01:15:29+5:30
पैठण : भानुदास-एकनाथचा जयघोष, डोक्यावर तुळशीवृंदावन, गळ्यात तुळशीमाळा, कपाळावर बुक्का अशा वेशातील वारकऱ्यांच्या उपस्थितीने आज पैठणनगरी आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर गजबजून गेली.

भक्तिभावाचे मंगलमय सूर
पैठण : मुखी विठुनामाचा गजर, हातात भगवी पताका, भानुदास-एकनाथचा जयघोष, डोक्यावर तुळशीवृंदावन, गळ्यात तुळशीमाळा, कपाळावर बुक्का अशा वेशातील वारकऱ्यांच्या उपस्थितीने आज पैठणनगरी आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर गजबजून गेली. भरपूर पाऊस पडू दे, असे साकडे घालीत लाखो भाविकांनी आज गोदास्नान करीत नाथांचे दर्शन घेतले. रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी नाथ मंदिरात भाविकांच्या रांगा लागलेल्या होत्या. वारकऱ्यांच्या मांदियाळीने पैठणनगरीत भक्तिभावाचे मंगलमय सूर दिवसभर निघत होते.
पहाटेपासूनच विविध वाहनांनी व दिंड्यांसह हजारो भाविकांचे शहरात आगमन सुरू होते. शहरातील सर्व धर्मशाळा, मठ आदींमध्ये हे भाविक व वारकरी मुक्कामी थांबले होते. भाविकांचे लोंढेच्या लोंढे शहरात दाखल होत होते. आज पहाटेपासून नाथ मंदिरापाठीमागील मोक्षतीर्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृष्णकमल तीर्थावरील गोदावरीच्या घाटावर पवित्र स्नानासाठी महिला व पुरुषांनी गर्दी केली होती. पहाटेपासून सुरू असलेले गोदास्नान दिवसभर सुरूच होते. गोदेचे स्नान करून, नाथांचे दर्शन घेऊन वारकरी प्रसन्न मनाने परत फिरत होते. जे भाविक पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेऊ शकत नाहीत, ते भाविक पैठणला येऊन नाथांचे दर्शन घेतात. आषाढीची ही परंपरा असल्याने आज लाखो भाविकांनी नाथांचे दर्शन घेतले. दिवसभरात दीड लाख भाविकांनी नाथ मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावली, असे नाथ संस्थानचे कार्यकारी विश्वस्त नंदलाल लाहोटी यांनी सांगितले.
पैठण वारीतूनही विठोबाच्या भेटीचे सुख मिळते, असे अनेक वारकऱ्यांनी पैठणवारीचे महत्त्व सांगितले. आषाढी वारीसाठी आज औरंगाबाद, जालना, बीड, अहमदनगर, नाशिक, जळगाव, परभणी आदी जिल्ह्यांतून वारकरी आले होते.
वारकऱ्यांना सुरळीत दर्शन घेता यावे म्हणून नाथ संस्थानचे अध्यक्ष आ. संजय वाघचौरे, कार्यकारी विश्वस्त नंदलाल लाहोटी, आय.पी.एस. पोलीस अधिकारी दीक्षित गेडाम, ए.पी.आय. केंद्रे, फौजदार अंकुश पाटोळे, संपत पवार आदी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. श्री एकनाथ सेवा संघाच्या वतीने भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. (वार्ताहर)
पावसाचे आगमन झाल्याने आनंद द्विगुणित
गेल्या दोन दिवसांपासून पैठण शहरासह तालुक्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले होते, परंतु पाऊस आला नव्हता. आषाढी एकादशीच्या दिवशी भाविकांनी नाथांना पावसासाठी साकडे घातले. सायंकाळी खरोखर पावसाला सुरुवात झाल्याने भाविकांचा आनंद द्विगुणित झाला. हजारो भाविकांनी नाथ महाराज व विठुरायाचा जयघोष करीत मंदिर परिसर दणाणून सोडला. भर पावसातही दर्शन घेण्यासाठी भाविकात उत्साह होता.