मृगाने दिला दगा, आर्द्रातही ढगांकडे बघा...
By Admin | Updated: July 1, 2014 01:03 IST2014-07-01T00:31:17+5:302014-07-01T01:03:07+5:30
एस.आर. मुळे , शिरूर अनंतपाळ मृग नक्षत्रात झालेल्या सरासरी ५० मि.मी. पावसाने शिरूर अनंतपाळ तालुक्यात मान्सून वेळेवर आला.

मृगाने दिला दगा, आर्द्रातही ढगांकडे बघा...
एस.आर. मुळे , शिरूर अनंतपाळ
मृग नक्षत्रात झालेल्या सरासरी ५० मि.मी. पावसाने शिरूर अनंतपाळ तालुक्यात मान्सून वेळेवर आला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उत्साहात खरीप हंगामातील पेरण्यांना सुरुवात केली, परंतु गेल्या आठ दिवसांपासून पाऊस गायब झाला. तालुक्यात झालेला पाऊस अवकाळी होता, याची आता जाणीव झाल्याने ‘मृगाने दिला दगा, आता आर्द्रातही ढगांकडे बघा’ असेच म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तर ‘पावसाळ्यात उन्हाळा अन् उन्हाळ्यात पावसाळा’ झाल्याने ऋतुचक्र बदलले की काय? अशी चर्चा शेतकऱ्यांतून केली जात आहे़
मार्च महिन्यात सलग अठरा दिवस गारपीट झाली. त्यामुळे तालुक्यातील ४८ गावांतील रबी पिकांना फटका बसला़ एवढेच नव्हे, तर एप्रिल आणि मे महिन्यातसुध्दा तीन-चार वेळा मोठा वादळी पाऊस झाला़ विजा कोसळून अनेक गावांतील शेतकऱ्यांचे पशुधन दगावले़ परिणामी, उन्हाळ्यात पावसाळा अन् पावसाळ्यात उन्हाळा असेच वातावरण निर्माण झाले असल्याने ऋतुचक्र्र बदलले की काय, अशी चर्चा शेतकऱ्यांत सुरू झाली आहे़ त्यामुळे ऋतुचक्राचा अभ्यास करून संशोधन होणे गरजेचे आहे, अशी मागणीसुध्दा शेतकऱ्यांतून होत आहे़
मृग नक्षत्रात मान्सून वेळेवर येणार, अशी घोषणा सुरुवातीला हवामान खात्यासह पंचांगकर्त्यांनीही केली होती़ शिवाय चालू वर्षात समाधानकारक पाऊस होणार असल्याचेही सांगण्यात आले़ त्यातच मृग नक्षत्राच्या शेवटी तालुक्यात सरासरी ५० मि.मी. पाऊस झाला़ त्यामुळे दैठणा, येरोळ, सुमठाणा, शिरूर अनंतपाळ, साकोळ, तळेगाव, शेंद, तिपराळ, नागेवाडी, हणमंतवाडी, आनंदवाडी, तुरूकवाडी, रापका, लक्कडजवळगा, जोगाळा आदी निम्म्या तालुक्यात शेतकऱ्यांनी पेरण्यांना प्रारंभ केला़ महागामोलाचे खते-बियाणे घालून ते उगवण्याची प्रतीक्षा करत आहेत़ पेरण्या होऊन आठ दिवस उलटले तरीही अनेकांचे बियाणे उगवलेच नाही़ त्यामुळे तालुक्यावर दुबार पेरणीचे संकट आले आहे़ पाऊस पडत नसल्याने फारशी माहिती नसूनही हवामानावर आधारित पीक विमा भरण्यासाठी शेतकरी सरसावल्याचे चित्र दिसत आहे.
एकरी सहा हजार खर्च...
तीन हजाराची सोयाबीन बॅग, तेराशेचा खत, एक हजार पेरणीचा खर्च आणि एक हजारांचे मजूर असा एकंदर एकरी सहा हजारापेक्षा अधिक खर्च शेतकऱ्यांचा झाला आहे़ त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाले असून, दुबार पेरणी कशी करायची, या विंवचनेत दिसत आहेत़
तर पंचनामे करा...
जून महिना संपला तरीही पाऊस पडत नसल्याने पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून दुबार पेरणीसाठी खते, बियाणे खरेदी करण्यासाठी एकरी दहा हजाराची मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांतुन केली जात आहे़