शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या
By Admin | Updated: August 20, 2014 01:00 IST2014-08-20T00:30:53+5:302014-08-20T01:00:16+5:30
राजेश चोबे, सिल्लोडराज्यातील आघाडी सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिला.

शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या
राजेश चोबे, सिल्लोड
देशभरातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष न दिल्यामुळे देशातून काँग्रेसला जनतेने हद्दपार केले आहे. राज्यातील अनेक तालुके पावसाअभावी दुष्काळाच्या खाईत जात आहेत, ही भीषण परिस्थिती लक्षात घेता राज्यातील आघाडी सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिला.
सिल्लोड -सोयगाव तालुक्यात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजपाच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयावर प्रदेशाध्यक्ष फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष सुरेश बनकर, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष मकरंद कोरडे, जिल्हा परिषदेचे गटनेते ज्ञानेश्वर मोटे, पंचायत समितीचे गटनेते इद्रिस मुलतानी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीरंग पाटील साळवे, नगरपालिकेचे गटनेते सुनील मिरकर, माजी सभापती अशोक गरुड, किरणदेवी जैस्वाल, राजेंद्र जैस्वाल, कैलास जंजाळ, डॉ. मच्छिंद्र पाखरे, गंगा ताठे, पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, तालुका अध्यक्ष दिलीप दाणेकर, सोयगावचे शिवाजी दुढाळ, रामभाऊ पठाडे, जयप्रकाश चौहान, अनिल खरात आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह विविध आघाड्यांचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले की, काँग्रेस आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत लक्ष न दिल्याने अनेक शेतकऱ्यांना आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागला. ठिबक सिंचन , जलसंवर्धन यासह शेतीला भरभराटी येईल, असे नियोजन न केल्याने कृषी विकासाला खीळ बसल्याचेही त्यांनी सांगितले.