मुलीच्या पित्याचा मजनूकडून खून

By Admin | Updated: May 17, 2016 00:27 IST2016-05-17T00:13:01+5:302016-05-17T00:27:39+5:30

औरंगाबाद : ‘तुमच्या मुलीचे माझ्यासोबत लग्न का लावून दिले नाही’ असे म्हणत तरुणाने एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या वडिलांचा तिच्या मावस भावाच्या

Girl's father murdered blood | मुलीच्या पित्याचा मजनूकडून खून

मुलीच्या पित्याचा मजनूकडून खून

एकतर्फी प्रेम : मुलगी देण्यास नकार; वरातीतच हल्ला
औरंगाबाद : ‘तुमच्या मुलीचे माझ्यासोबत लग्न का लावून दिले नाही’ असे म्हणत तरुणाने एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या वडिलांचा तिच्या मावस भावाच्या लग्नाच्या वरातीतच चाकूने भोसकून खून केला. यावेळी तरुणीच्या मावस भावावरही प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही खळबळजनक घटना रविवारी रात्री बीड बायपास रोडवरील प्रसाद लॉनजवळ घडली.
सदाशिव मोदाजी जाधव (४५, रा. निर्मलनगर) असे खून झालेल्या पित्याचे नाव आहे. तर हल्ल्यात राजू सर्जेराव पाईकराव (२८, रा. निर्मलनगर) हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हे कृत्य करणाऱ्या संदेश ऊर्फ बाळू सुरेश पटेकर (२०), त्याचे वडील सुरेश लक्ष्मण पटेकर (४५) व काका गोरख अंबादास कोकणे (३३, रा. तिघेही निर्मलनगर, मुकुंदवाडी, रेल्वेस्टेशन परिसर) या तिघांना मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली.
घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, आरोपी संदेश पटेकर आणि मयत सदाशिव जाधव हे निर्मलनगरात शेजारी शेजारीच राहतात. संदेश हा जाधव यांच्या मुलीवर एकतर्फी प्रेम करीत होता. त्याने अनेकदा तिला मागणी घातली होती. विशेष म्हणजे संदेशने आपल्या आई- वडिलांनाही मागणीसाठी जाधव कुटुंबाच्या घरी पाठविले होते; परंतु जाधव यांनी संदेशला आपली मुलगी देण्यास स्पष्ट नकार दिला. नकारानंतर लगेच जाधव यांनी दुसरा चांगला मुलगा शोधून आपल्या मुलीचा थाटामाटात विवाह लावून दिला.
मुलगी दिली नाही म्हणून संदेशबरोबरच त्याच्या घरच्या मंडळींनाही जाधव कुटुंबाबाबत प्रचंड राग मनात खदखदत होता. आपल्या या अपमानाचा बदला घ्यायचाच, असा विचार पटेकर कुटुंब करीत होते. अखेर रविवारी या कुटुंबाने डाव साधला.
वरातीच्या गोंधळात केला हल्ला!
सदाशिव जाधव यांच्या साडूचा मुलगा विजू पाईकराव याचा काल रात्री बीड बायपास रोडवरील प्रसाद लॉनवर विवाह समारंभ होता. सायंकाळी नवरदेवाची वरात निघाली. या वरातीत जाधवही सहभागी झाले होते. वाद्यावर नाच-गाणे सुरू असतानाच अचानक आरोपी संदेश ऊर्फ बाळू, त्याचे वडील सुरेश आणि काका गोरख कोकणे वरातीत आले. वास्तविक पाहता त्यांना लग्नाचे आमंत्रणच नव्हते. जाधव आणि पटेकर समोरासमोर (पान २ वर)
तीन आरोपींना अटक
घटनेची माहिती मिळताच मुकुंदवाडी ठाण्याचे फौजदार कल्याण शेळके, ताहेर पटेल, कर्मचारी प्रकाश सोनवणे, विजय चौधरी, गावंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. नंतर आरोपींचा शोध सुरू केला. अखेर पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास आरोपी संदेश ऊर्फ बाळू, त्याचा बाप सुरेश पटेकर आणि काका गोरख कोकणे हे तिघे पोलिसांच्या हाती लागले. या तिघांना अटक करण्यात आली. तिघांविरुद्ध मुकुंदवाडी ठाण्यात खून आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
लग्न मंडपात शोककळा
हा प्रकार लग्न मंडपापासून हाकेच्या अंतरावर घडला. हल्ला करून तिन्ही आरोपींनी शस्त्राचा धाक दाखवून सर्व लोकांसमोर तेथून धूम ठोकली.
या प्रकाराची माहिती लग्न मंडपात येऊन धडकताच तेथील आनंदावर विरजण पडले. शोककळा पसरली. रडारडी सुरू झाली. अशाच शोकावस्थेत तात्काळ लग्न उरकण्यात आले.
जखमी सदाशिव जाधव यांना घाटीत आण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. तर राजूला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Web Title: Girl's father murdered blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.