सकाळी घराबाहेर पडा, वसुली करा
By Admin | Updated: August 20, 2014 01:53 IST2014-08-20T01:47:32+5:302014-08-20T01:53:45+5:30
दिनेश गुळवे , बीड एकीकडे जिल्ह्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती असून जिल्ह्यात टंचाई जाहीर करण्यात आली आहे. पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत

सकाळी घराबाहेर पडा, वसुली करा
दिनेश गुळवे , बीड
एकीकडे जिल्ह्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती असून जिल्ह्यात टंचाई जाहीर करण्यात आली आहे. पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तर, दुसरीकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेतील अधिकारी, कर्मचारी व शिपायास वसुली करण्यासाठी फतवा काढण्यात आला आहे. गंभीर बाब म्हणजे सुटीच्या दिवशीही वसुली करण्यास व वसुली न केल्यास वेतन न देण्याची ताकीदही देण्यात आली आहे.
डीसीसी बॅँकेचे सभासद शेतकरी, विविध संस्था, विद्यार्थी, महिला बचत गट आदींकडे मिळून जवळपास चारशे कोटी रुपयांचे थकित कर्ज आहे. बॅँकेकडे पाचशे कोटींहून अधिक ठेवी असल्याने त्या मिळण्यासाठी ठेवीदार दररोज खेटे घालीत आहेत. गंभीर बाब म्हणजे एनपीए न राखला गेल्यास बॅँकींग परवाना रद्द करण्याचे संकेतही वरिष्ठांनी दिले आहेत. बॅँकिंग परवाना रद्द झाल्यान वसुली व ठेवीदारांच्या पैशांचा मोठा प्रश्न निर्माण होईल, असे होऊ नये म्हणून बॅँकेच्या प्रशासक मंडळाने अधिकारी, कर्मचाऱ्यांसह शिपायांसाठीही आदेश काढला आहे. सकाळी सात ते दहा व सायंकाळी सहा ते आठ या वेळेत वसुलीसाठी घराबाहेर पडण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे बँकेतील दैनंदिन कामकाज करतानाच हे काम करावयाचे आहे. यासाठी सर्वांना दररोजचे उद्दिष्ठही ठरवून दिले आहे. जे अधिकारी, कर्मचारी, शिपाई दिलेले उद्दिष्ठ पूर्ण करणार नाहीत त्याचे वेतन थांबविण्याचेही आदेश बजावण्यात आले आहेत. शिवाय त्यांच्यावर कामात कसूर केल्याबद्दलही कारवाई करण्यात येणार असल्याचे बॅँकेतून सांगण्यात आले. शेतकऱ्यांसह इतरांकडे थकित कर्ज ५९ टक्के आहे, तर बिगर शेती संस्थांकडे शंभर टक्के थकित कर्ज आहे. हे पैसे वसूल करण्यासाठी बॅँकेने कडक भूमिका घेतली आहे. बॅँकेच्या या आदेशाने मात्र, अधिकाऱ्यांसह सर्वच पेचात सापडले आहेत. पाऊस नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. काही शेतकऱ्यांनी आत्महत्याही केल्या आहेत. अशा परिस्थितीत तगादा लावल्यास व अनुचित प्रकार घडल्यास ‘आपलेच नाव’ पुढे येऊ शकते, अशी भीतीही कर्मचाऱ्यांना आहे. तेव्हा ‘काय करावे?’ असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. आदेशात म्हटले आहे की, सक्तीने वसुली करावी. ही जप्ती ची कारवाई सूर्याेदयानंतर ते सूर्यास्तापर्यंत करावी असेही म्हटले आहे. तसेच थकित पैसे न दिल्यास फौजदारी कारवाई करावी, असेही सुचविले आहे.
दरम्यान, असे आदेश असले तरी सध्या टंचाई परिस्थिती असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा परिस्थितीत बॅँकेच्या भूमिकेवरही शेतकऱ्यांतून रोष व्यक्त होत आहे.
दैनंदीन वसुलीचे उद्दीष्ट
व्यवस्थापक ८०,०००
उपव्यवस्थापक ७०,०००
स.व्यवस्थापक ६०,०००
बँकींग आॅफिसर ५०,०००
क.बँकींग आॅफिसर ४०,०००
क. सहायक ३०,०००
शिपाई १०,०००