सर्वसामान्य रुग्णांना जेनेरिक औषधींचा आधार
By Admin | Updated: April 8, 2016 00:25 IST2016-04-08T00:04:14+5:302016-04-08T00:25:37+5:30
राजकुमार जोंधळे , लातूर दिवसेंदिवस सर्वसामान्य रुग्णांना उपचार घेणे आता जिकरीचे बनले असून, उपचारावर होणारा हजारो रुपयांचा खर्च सर्वसामन्य रुग्णांच्या कुटुंबियांना न परवडणारा आहे.

सर्वसामान्य रुग्णांना जेनेरिक औषधींचा आधार
राजकुमार जोंधळे , लातूर
दिवसेंदिवस सर्वसामान्य रुग्णांना उपचार घेणे आता जिकरीचे बनले असून, उपचारावर होणारा हजारो रुपयांचा खर्च सर्वसामन्य रुग्णांच्या कुटुंबियांना न परवडणारा आहे. मात्र नाईलाजास्तव वेळप्रसंगी कर्ज काढून हा खर्च भागविला जातो. परिणामी, वेळेवर उपचार न झाल्यामुळे अनेकांना आपला जिवही गमवावा लागतो. आता सर्वसामान्यांना परवडेल अशाच माफक किंमतीत जवळपास ४५० प्रकारची औषधी लातुरात ‘जेनेरिक औषधालया’च्या माधयामातून उपलब्ध करुन देण्याचा अशोक चव्हाण यांचा प्रयत्न लाखमोलाचा ठरला आहे.
केंद्रिय रसायन आणि खत मंत्रालयाच्या वतीने जवळपास ५०० प्रकारच्या विविध औषधीची निर्मिती करण्यात येते. राज्यात १६ ठिकाणी ‘जन औषधी’ची दुकाने थाटण्यात आली आहेत. मराठवाड्यात जालना आणि लातूर येथे हे जन औषधालय सुरु करण्यात आले आहे. या औषधालयासाठी लातुरातील सामाजिक कार्यकर्ते अशोक चव्हाण, प्रशांत चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे. सध्या जिल्हाभरातुन रुग्णांचे नातेवाईक औषधी खरेदीसाठी गर्दी करुन लागले आहेत. केवळ औषधांच्या वाढत्या खर्चामुळे अनेक कुटुंब कर्जबाजारी होत आहेत. वेळप्रसंगी उपचाराचा खर्च झेपत नसल्याने उपचार थांबवावा लागत आहे. शासनाची ‘जेनेरीक औषधी’ अंत्यत स्वस्त आहेत. डॉक्टरांकडून मात्र ती लिहून दिली जात नाहीत, असा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांतून केला जात आहे. देशी-विदेशी कंपन्यांकडून डॉक्टरांना मोठ्या नफेखोरीच्या सवलतींची खैरात केली जाते. त्यातून हजारो रुपयांची औषधी रुग्णाच्या नातेवाईकांच्या माथी मारली जातात.
महिन्याकाठी हजारो रुपयांची लूट आरोग्य क्षेत्रातील या व्यवस्थेकडून केली जाते. याच व्यवस्थेला आव्हान देत सर्वसामान्यांची आर्थिक लूट थांबविण्यासाठी आम्ही हे ‘जन औषधालय’ सुरु केले असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी सांगितले. आर्थिक लुटीचा उपचार टाळण्यासाठीच जेनेरिक औषधी महत्वाची आहे, असेही ते म्हणाले.