शालेय स्तरापासून लैंगिक शिक्षण द्यावे
By Admin | Updated: December 28, 2014 01:26 IST2014-12-28T01:08:50+5:302014-12-28T01:26:42+5:30
प्रशांत तेलवाडकर, औरंगाबाद हाती लैंगिक साहित्य, छायाचित्र, व्हिडिओ क्लिप्स आदी अगदी सहज पडू लागले आहे. ज्यातून त्यांना अवास्तव, चुकीची व अर्धवट माहिती मिळत आहे.

शालेय स्तरापासून लैंगिक शिक्षण द्यावे
प्रशांत तेलवाडकर, औरंगाबाद
मोबाईल, इंटरनेट यातून किशोरवयीन मुलांच्या हाती लैंगिक साहित्य, छायाचित्र, व्हिडिओ क्लिप्स आदी अगदी सहज पडू लागले आहे. ज्यातून त्यांना अवास्तव, चुकीची व अर्धवट माहिती मिळत आहे. आकर्षण आणि अज्ञान यातून लैंगिक अत्याचारासारखे प्रकार घडत आहेत. इयत्ता सहावी किंवा सातवीपासून मुला-मुलींना लैंगिक शिक्षण दिले, तर येत्या १० ते १५ वर्षांत लैंगिक अत्याचाराचे प्रकार कमी होतील, असे ठाम उत्तर ७२ टक्के कॉलेजकुमार व कुमारींनी दिले. तसेच लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी ६४ टक्के युवांनी केली.
‘लैंगिकता आणि तरुणाई’ या विषयावर शहरातील युवक-युवतींना नेमके काय वाटते. याचा वेध सर्वेक्षणातून घेण्यात आला. लैंगिकतेविषयी पालक व शिक्षकांकडे मनातील शंका विचारण्यासाठी वाटणारी भीती, संकोच यामुळे मुले-मुली मनातील शंका, आकर्षणाचे उत्तर शोधण्यासाठी चुकीचा मार्ग अवलंबतात. यासाठी शिक्षण पद्धतीत लैंगिक शिक्षणाचा समावेश करणे किती आवश्यक आहे हे प्रखरतेने जाणवले. सर्वेक्षणात १ हजार पैकी ८३ टक्के मुला-मुलींना लैंगिकतेविषयी माहितीची गरज वाटते.
मासिक पाळीमुळे आईचा मुलींशी या विषयावर संवाद होतो, असे ९१ टक्के मुलींनी सांगितले; पण लैंगिक विषयावर पालकांशी संवाद फक्त १६ टक्के युवकांचा झाला असल्याचे निदर्शनास आले. कौमार्याची संकल्पना कोणाला लागू आहे, मुलांना की मुलींना, असा प्रश्न विचारण्यात आला होता. बहुतांश तरुण-तरुणींना कौमार्य म्हणजे काय हेच कळाले नाही. त्यांना ‘व्हर्जिनिटी’ असे सांगण्यात आले तेव्हा अनेकांना हा प्रश्न समजला. अर्थात, लैंगिकतेविषयी स्वभाषेत बोलताना संकोच वाटतो आणि मातृभाषेतील शब्दाचे आकलनही होत नाही, अशी अवस्था युवकांची झाली आहे. मुलांच्या ‘मर्दानगी’च्या काय कल्पना आहेत याविषयी ‘स्त्रीवर लैंगिक अत्याचार पुरुषांच्या मर्दानगीच्या अवास्तव कल्पनेतून होतात का’ असा प्रश्न विचारला असता ६० टक्के मुलांनी हे विधान खरे असल्याचे सांगितले, तर ४२ टक्केच मुलींना हे विधान बरोबर असल्याचे वाटते. एकीकडे स्त्री-पुरुष समानतेची खूप गरज आहे, असे ठामपणे म्हणायचे आणि दुसरीकडे महिलांनी नोकरी केल्यामुळे, रात्री उशिरा घराबाहेर राहिल्यामुळे त्यांच्यावर अत्याचार होतात, अशी दुटप्पी उत्तरेही युवकांनी दिली.
मुलांना खुल्या वातावरणात वाढविणे हे तर बहुसंख्य शहरी पालक करतातच; पण त्याचबरोबर त्यांच्या लैंगिक प्रश्नांविषयी, गैरसमजांविषयी, स्त्रीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाविषयी पालकांनी योग्य वेळी, योग्य तऱ्हेने आणि सतत संवाद साधला पाहिजे यासाठी शिक्षकांची, तर सामाजिक संस्थांची, समाजाची, पुस्तकांची मदत घेतली पाहिजे. लैंगिक शिक्षण शालेय स्तरापासून दिले, तर काही बदल होऊ शकतील; अन्यथा लैंगिक अत्याचाराची घटना घडली की नुसते हळहळणे, चिडणे, धास्ती घेणे, हतबल होणे एवढेच आपल्या हाती राहील.
प्रत्यक्ष तुमच्यासमोर कोणी एखाद्या स्त्रीवर लैंगिक अत्याचार करीत असेल तर तुम्ही काय कराल? या प्रश्नाला ६४ टक्के तरुण-तरुणींनी आपण अशा वेळी तटस्थ राहू, असे धक्कादायक उत्तर दिले. यातील ४७ टक्के जणांनी पोलीस व न्यायप्रक्रियेत अडकण्याची भीती आणि कौटुंबिक दडपण अशी पळपुटी, भाकड कारणे सांगितली.
काही महिन्यांपूर्वी एका स्त्री बसवाहकाला भररस्त्यात मारहाण करण्यात आली आणि तिथे हजर ४० ते ५० प्रवाशांनी नुसती बघ्याची भूमिका घेतली, नराधमाला रोखण्यासाठी कोणी पुढे आले नाही, याचे मूळ युवांनी दिलेल्या उत्तरातच दिसून आले.
अत्याचार करणाऱ्यांना रोखण्यासाठी युवकांनी जी असहायता जाणवली, ते दडपण व भीतीही दूर होणे आवश्यक आहे. अशा वेळी कौटुंबिक, सामाजिक पातळीवर तरुणांना दिशा दाखविणे किती गरजेचे आहे हे प्रखरतेने जाणवले.
लैंगिक अत्याचाराला फाशीच योग्य -युवकांचे मत
लैंगिक अत्याचार करणाऱ्यास काय शिक्षा द्यावी, या प्रश्नाला ६४ टक्के जणांनी फाशीची शिक्षा द्यावी, असे उत्तर दिले, तर ३६ टक्के मुलांनी अशा नराधमास नपुंसक करावे, असे सुचविले.
प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्नपत्रिका देण्यात आली. त्यात ९ प्रश्न विचारण्यात आले होते. साकारच्या अध्यक्ष डॉ. सविता पानट यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. नीलिमा पांडे आणि संस्थेच्या सर्व सदस्यांनी सर्वेक्षण केले.
शालेय स्तरापासूनच लैंगिक शिक्षण गरजेचे
अनाथालयात येणाऱ्या बाळांपैकी ९० टक्क्यांपेक्षा जास्त बाळ ही अविवाहित, कुमारी मातांची आहेत. गर्भवती राहण्याचे मुख्य कारण म्हणजे लैंगिक अज्ञान, आर्थिक समस्या, स्वत:च्या शरीराविषयी, लैंगिक व्यवहाराविषयी असणारे अज्ञान हेच होय. अशा घटनांना रोखण्यासाठी शालेय स्तरापासून लैंगिक शिक्षण देणे गरजेचे बनले आहे. यात इयत्ता सहावी किंवा सातवीपासून आणि तेही सातत्याने देणे अपेक्षित आहे. लैंगिकता म्हणजे नुसती जननेंद्रियांची माहिती देणे नव्हे, तर त्यात लिंगभेद, लिंग संवेदीकरण, स्त्री-पुरुष समानता, स्त्रीत्वाचा आदर होय. प्रत्येक महिला मंडळाने, कुठल्याही संवेदनशील गटाने असे काम केले तर बराच फरक पडेल. सर्व पालकांनी मिळून शालेय प्रशासनावर असे लैंगिकतेचे शिक्षण देण्यासाठी दबाव आणला पाहिजे.
-डॉ.सविता पानट
(अध्यक्ष, साकार संस्था)