शहराच्या तोंडावर कचऱ्याच्या ढिगारे
By Admin | Updated: June 23, 2014 00:25 IST2014-06-22T23:30:43+5:302014-06-23T00:25:08+5:30
चंद्रकांत देवणे , वसमत शहरात प्रवेश करतानाच प्रवेशाच्या मुख्य रस्त्यावर कचऱ्यांचे ढिगारे व कोंबड्यांच्या पंखांची दुर्गंधी स्वागतासाठी सज्ज असते,

शहराच्या तोंडावर कचऱ्याच्या ढिगारे
चंद्रकांत देवणे , वसमत
शहरात प्रवेश करतानाच प्रवेशाच्या मुख्य रस्त्यावर कचऱ्यांचे ढिगारे व कोंबड्यांच्या पंखांची दुर्गंधी स्वागतासाठी सज्ज असते, हे दृश्य पाहूनच वसमत शहरातील गल्लीबोळात स्वच्छतेचे काय हाल असतील? याचा अंदाज शहरात प्रथम येणारे पाहुणे लावत असतात. न. प. च्या दुर्लक्षामुळेच ही स्थिती निर्माण झाली आहे.
वसमत नगरपालिकेच्या कारभारावर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. शहरात स्वच्छता असावी लागते. शहर स्वच्छ असावे लागते. शहरातील महिलांना व नागरिकांना बाजारातून पायी ये-जा करताना त्रास होवू द्यायचा नसतो, बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना सुविधा पुरवायच्या असतात, हे वसमत नगर पालिका प्रशासनासह सत्ताधाऱ्यांना माहितच नसावे , असे चित्र सध्या वसमत शहराचे झाले आहे. चोहीकडे घाण, गटारगंगा व दुर्गंधीचे साम्राज्य वसमतमध्ये पहावयास मिळत आहे. नगरपालिकेच्या कारभारावर नगराध्यक्षांचे व सदस्यांचे नियंत्रण नसल्यावर काय अवस्था होते, याचे दर्शन वसमत शहरात प्रवेश करतानाच घडते. इतर गावात प्रवेश करताना ‘नगरपालिकेच्या वतीने या शहरात आपले स्वागत आहे’ असे फलक पहावयास मिळतात. वसमत नगरपालिकेला असा फलक लावण्याची गरजच वाटली नसल्याने असा फलक पहावयास मिळत नाही. परंतु शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व रस्त्याच्या कडेला घाणीचे, दुर्गधीचे व कचऱ्याचे साम्राज्य मात्र हमखास दिसते. परभणी रस्त्यावरून येताना शहरात सुरूवातीलाच दादऱ्याजवळ नगर पालिकेने शहरातून उचललेला कचरा वाहनाद्वारे आणून टाकला असल्याचे व त्याचे ढिगारे उभे असल्याचे विचित्र चित्र पहावयास मिळते. कचरा- घाण अशी शहराच्या प्रवेशद्वाराजवळ व रस्त्याच्या कडेला जमा करण्याची ही पद्धत फक्त वसमत न. प. चाच पॅटर्न असावा, अशीच परिस्थिती आहे. परभणी रस्त्यावर झालेले हे कचऱ्याचे ढिगारे दुर्गधी पसरवतात, या प्रकाराकडे आजवर कधीच नगरपालिकेच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांचे लक्ष गेले नाही, हे विशेष. रेल्वेस्थानक रस्त्यावर शहराचे ग्रामदैवत असलेल्या शिवशिवेश्वराचे मंदिर आहे. या मंदिराकडे महिला व भाविक दररोज ये-जा करत असतात. त्यांनाही दर्शनासाठी गटारगंगेतूनच जावे लागते आहे. एवढ्या दुर्गंधीयुक्त वातावरणातून शहरात पाय ठेवतानाच मुख्य शहरात काय अवस्था असेल, याचे गणित मांडतच प्रवासी शहरात दाखल होत असतात.
नांदेडकडून वसमत शहरात येतानाही बकाल अवस्था आहे. चंदगव्हाण पाटीपासून शहरापर्यंत अनेक जागी कचऱ्याचे ढिगार टाकलेले पहावयास मिळतात. हा कचरा अक्षरश: नगरपालिकेच्या वाहनाद्वारेच रस्त्याच्या कडेला टाकला जातो, हे विशेष. उघडी नदीजवळ येताच दुर्गंधीचा दर्प नाकाला झोंबतो. हा उग्रदर्प शहरातील उघड्यावर मांसविक्री करणारांनी दुकानातील शिल्लक अवशेष, मांसाचे तुकडे व कोंबड्यांच्या पंखाचा आहे. एसटीतून जातानाही हा उग्र दर्प प्रत्येकाला नाकाला रूमाल लावण्यास भाग पाडत असतो.
४गेल्या वर्षभरापासून शहर अस्वच्छतेच्या कचाट्यात सापडले असताना सर्वांचे त्याकडे दुर्लक्ष झाले.
प्रवाशांना होतोय मानसिक ताण
औंढा रस्त्याने वसमत शहरात प्रवेश करताना अगदी नागरी वस्तीजवळच रस्त्याच्या कडेला कोंबड्यांच्या पंखांचे ढिगारे व दुर्गंधीयुक्त उकिरडा आपले स्वागत करत असतो. हा रस्ता पार करतानाही उग्र दर्प येतो. या सर्व प्रकारामुळे शहरातून ये-जा करणारे प्रवासी, वाहनधारक त्रस्त झाल्याचे चित्र दिसून येत आहे. रेल्वे मार्गे येणाऱ्या प्रवाशांना तर शहरात पाय ठेवताच गटारगंगा ओलांडावी लागते. रेल्वे स्थानकावरून काजीपुऱ्यापर्यंत मुख्य रस्त्यावर गटाराचे पाणी नेहमी आपल्या स्वागताला हजर असते. त्यामुळे रेल्वे स्थानकावरून पायी शहरात येणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो.
गेल्या वर्षभरापासून शहर अस्वच्छतेच्या कचाट्यात सापडले आहे. मात्र या परिस्थितीची नगरपालिकेचे कर्ते करविते व सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाने कधी दखल घेतलेली नाही. परिणामी वसमत शहराच्या स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत.