नगराध्यक्षांच्या दालनात कचरा
By Admin | Updated: June 28, 2017 00:37 IST2017-06-28T00:36:46+5:302017-06-28T00:37:33+5:30
बीड : बीड नगर पालिकेचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या दालनात मंगळवारी एमआयएम व काकू-नाना आघाडी नगरसेवकांनी कचरा व घाण टाकली

नगराध्यक्षांच्या दालनात कचरा
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड नगर पालिकेचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या दालनात मंगळवारी एमआयएम व काकू-नाना आघाडी नगरसेवकांनी कचरा व घाण टाकली. यामुळे पालिकेतील वाद पुन्हा एकदा चिघळला आहे. स्वच्छतेच्या कामात नगराध्यक्ष खोडा घालत असल्याचा आरोप करीत त्यांनी आंदोलन केले.
नगर पालिकेच्या निवडणुकीपासून पालिकेत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी होताना दिसत आहेत. नगराध्यक्षांविरोधात काकू-नाना आघाडी वारंवार वेगवेगळ्या मुद्यांवरून आक्रमक होताना दिसून येत आहे. याच आठवड्यात विशेष सभा, आढावा बैठकीच्या कारणावरून पालिकेत वाद झाले होते. मंगळवारी पुन्हा एकदा हा वाद स्वच्छतेच्या कारणावरून उफाळून आला. शहरातील स्वच्छतेच्या कामांसह विकास कामांत नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर खोडा घालतात. तसेच नगराध्यक्ष पद स्वीकारल्यापासून त्यांनी पालिकेत मनमानी सुरू केली आहे. यामुळे पालिकेतील कामे खोळंंबली आहेत. तसेच कर्मचाऱ्यांमध्ये त्यांनी दहशत निर्माण करून आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप आघाडीने केला आहे. दरम्यान, आघाडी व नगराध्यक्ष यांच्या वादात शहरात विकास कामांना‘ब्रेक’ लागला आहे. शहरातील जनताही आता पालिकेतील कारभाराला वैतागली असून तीव्र संताप व्यक्त करीत आहे. परंतु याचे काहीच देणेघेणे आघाडी व नगराध्यक्षांना नसल्याचे दिसते. वेळीच कारभार सुधारला नाही तर नागरिकही आक्रमक होतील, अशी परिस्थिती आता दिसू लागली आहे. या आंदोलनात संदीप क्षीरसागर, उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, बांधकाम सभापती अमर नाईकवाडे, पाणीपुरवठा सभापती फारूक पटेल, बाळासाहेब गुंजाळ, युवराज जगताप यांच्यासह आघाडीचे नगरसेवक, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
सभापतींचा पुढाकार
नगराध्यक्ष यांच्या दालनात घाण आणि कचरा टाकण्यासाठी खुद्द स्वच्छता सभापती तथा उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांचाच पुढाकार होता. स्वच्छतेसाठी नगराध्यक्ष खोडा घालत असल्याने आपल्याला हे नाईलाजास्तव पाऊल उचलावे लागल्याची प्रतिक्रिया उपनगराध्यक्ष क्षीरसागर यांनी व्यक्त केली.
दरम्यान, शिपाई कानडे यांच्या फिर्यादीवरुन १५ ते २० जणांविरुद्ध शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला.