नगरच्या वाहनचोरांची टोळी औरंगाबादेत अटक
By Admin | Updated: December 16, 2014 01:08 IST2014-12-16T00:49:54+5:302014-12-16T01:08:03+5:30
औरंगाबाद : औरंगाबादेत येऊन वाहनचोऱ्या करणाऱ्या नगर जिल्ह्यातील एका टोळीला विशेष पोलीस पथकाने आज दुपारी चिकलठाणा परिसरात अटक केली.

नगरच्या वाहनचोरांची टोळी औरंगाबादेत अटक
औरंगाबाद : औरंगाबादेत येऊन वाहनचोऱ्या करणाऱ्या नगर जिल्ह्यातील एका टोळीला विशेष पोलीस पथकाने आज दुपारी चिकलठाणा परिसरात अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये गणेश मारोती मोहिते (१८), सागर रामदास गायकवाड (२१), आदिनाथ ऊर्फ अजय भीमा धनवटे (१९) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. हे सर्व आरोपी नगर जिल्ह्यातील नेवासा फाटा येथील रहिवासी आहेत. आरोपींच्या ताब्यातून आतापर्यंत चोरीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
कारवाईबाबत पोलिसांनी सांगितले की, औरंगाबादेतून वाहन चोरून अहमदनगरला घेऊन जाणारी एक टोळी चिकलठाणा परिसरातील हिनानगरात आली आहे, अशी माहिती खबऱ्याकडून पोलीस उपायुक्त वसंत परदेशी यांच्या विशेष पथकाला मिळाली. माहिती मिळताच पथकाचे फौजदार प्रशांत आवारे, सहायक फौजदार कल्याण शेळके, योगेश गुप्ता, सचिन काशीद, विवेकानंद औटी, संदीप धर्मे यांनी खबऱ्याने सांगितलेल्या ठिकाणी छापा मारला. तेथे वरील चारही आरोपी सापडले. त्यांच्याकडे पाच दुचाकी आढळून आल्या. ‘खाक्या’ दाखवून विचारपूस करताच आरोपींनी या पाचही दुचाकी चोरीच्या असल्याची स्पष्ट कबुली दिली. त्यातील एक दुचाकी पुण्यातून चोरटल्याचे, एक नगर जिल्ह्यातील राहुरीतून व दोन औरंगाबादेतून चोरी केल्याचे उघडकीस आले. सध्या चोरटे पोलीस कोठडीत असून त्यांच्याकडून आणखी काही वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.