१० वॅगन घेऊन जलपरीची चौथी फेरी
By Admin | Updated: April 16, 2016 00:12 IST2016-04-15T23:46:08+5:302016-04-16T00:12:20+5:30
लातूर : लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मिरजेहून रेल्वेने पाणी आणण्यात येत आहे. गेल्या मंगळवारपासून दररोज ५ लाख लिटर्सची एक खेप करण्यात येत असून,

१० वॅगन घेऊन जलपरीची चौथी फेरी
लातूर : लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मिरजेहून रेल्वेने पाणी आणण्यात येत आहे. गेल्या मंगळवारपासून दररोज ५ लाख लिटर्सची एक खेप करण्यात येत असून, शुक्रवारी जलपरीने १० वॅगनची एक खेप केली. आतापर्यंत रेल्वेने २० लाख लिटर्स पाणी आणण्यात आले आहे.
मिरजेहून ५० वॅगन पाणी आणण्याचे नियोजन आहे. मात्र पाणी भरणे व उतरविण्याची यंत्रणा आणखी कार्यक्षम नाही. त्यामुळे सद्य:स्थितीत दहा वॅगन आणल्या जात आहेत. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता जलपरी दहा वॅगन घेऊन आली. ६.१५ वाजता वॅगनमधील पाणी रेल्वे स्थानकालगत असलेल्या एस.आर. देशमुख यांच्या विहिरीत उतरविण्यात आले. त्यानंतर या विहिरीतून टँकरद्वारे आर्वी येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी टाकण्यात आले. रात्री १० वाजेपर्यंत पाणी उतरविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर जलपरी मिरजेकडे रवाना झाली. दरम्यान, लातूर दौऱ्यावर असलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी रेल्वेस्थानकातील पाणी उतरविण्याच्या प्रक्रियेची तसेच विहिरीची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत खा.डॉ. सुनील गायकवाड, आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, आमदार सुधाकर भालेराव, महापौर अख्तर शेख, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता सुशिल आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
उजनीहून रेल्वे वॅगनच्या आतापर्यंत चार फेऱ्या झाल्या असून, प्रती फेरी ५ लाख लिटर पाणी असे एकूण २० लाख लिटर पाणी मिरजेहून आणले आहे.