चार लाखांचे रेशनचे धान्य जप्त
By Admin | Updated: August 12, 2015 00:58 IST2015-08-12T00:50:52+5:302015-08-12T00:58:33+5:30
नळदुर्ग : रेशन मालाचा काळा बाजार करण्यासाठी साठवून ठेवलेल्या जवळपास चार लाख किंमतीचे रॉकेल, गहू व तांदूळ यावर छापा टाकल्याची घटना

चार लाखांचे रेशनचे धान्य जप्त
नळदुर्ग : रेशन मालाचा काळा बाजार करण्यासाठी साठवून ठेवलेल्या जवळपास चार लाख किंमतीचे रॉकेल, गहू व तांदूळ यावर छापा टाकल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तुळजापूर तालुक्यातील ईटकळ शिवारात पाझर तलावाजवळ घडली.
अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली घाडगे यांना मिळालेल्या माहितीनुसार उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खांडवे, तुळजापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दांडगे व नळदुर्गचे सपोनि फुलचंद मेंगडे यांनी फौजफाट्यासह ईटकळपासून दोन किमी अंतरावर असलेल्या पाझर तलावाजवळील शेडमध्ये छापा टाकला. त्यावेळी तेथे रेशनचे अडीचशे लिटरचे ४५ बॅरल निळे रॉकेल आढळून आले. याबरोबरच दीडशे ते दोनशे पोती गहू व तांदूळ (पन्नास किलो वजनाचा माल) मिळून आला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस घटनास्थळाचा पंचनामा, नमुने तपासणी व वजन करीत होते. याप्रकरणी तुळजापूर तालुक्यातील एका मुख्य विक्रेत्याच्या दोन मुलाला पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. सुमारे चार लाख रुपये बाजार किंमतीचा रेशनमालाचा साठा काळा बाजार करण्यासाठी ठेवण्यात आल्याचे उघड झाल्याने परिसरातील स्वस्त धान्य दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणात अनेक रिटेल रॉकेल विक्रेते, स्वस्त धान्य दुकानदार व गोडाऊन किपर समोर येण्याची शक्यता असून, हा काळा बाजार अनेक महिन्यापासून प्रसंगी वर्षापासून सुरू असावा, असा संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली घाडगे म्हणाल्या की, या प्रकरणी आज गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार ही कार्यवाही करण्यात आलेली असून, सदरील छाप्यात सापडलेल्या मालाचे वजन व मूल्य अद्याप ठरविण्यात आलेले नाही. (वार्ताहर)
मागील सात-आठ महिन्यापूर्वी जिल्ह्यात शहरी, ग्रामीण भागात रेशनच्या धान्याचा मोठा तुटवडा झाला होता़ अनेक ठिकाणी धान्य असतानाही मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या़ त्यातच ईटकळ येथे पोलिसांनी लाखो रूपयांचे धान्य, रॉकेल जप्त केल्याने रेशन तस्करीच्या चर्चेला ऊत आला आहे़ त्यामुळे महसूल प्रशासनाने शहरी, ग्रामीण भागातील रेशनच्या मालाची वेळोवेळी तपासणी करून दोषींवर सक्त कारवाई करावी, अशी मागणी लाभधारकांमधून केली जात आहे़