साडेसातशे नळ कनेक्शन बोगस
By Admin | Updated: November 17, 2015 00:29 IST2015-11-17T00:06:44+5:302015-11-17T00:29:22+5:30
नळदुर्ग : शहरामध्ये तब्बल ७५० नळकनेक्शन बोगस तर ७० टक्के शासकीय जमिनीवर अतिक्रमण झाल्याची माहिती नगर परिषदेने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे.

साडेसातशे नळ कनेक्शन बोगस
नळदुर्ग : शहरामध्ये तब्बल ७५० नळकनेक्शन बोगस तर ७० टक्के शासकीय जमिनीवर अतिक्रमण झाल्याची माहिती नगर परिषदेने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. त्यामुळे एकीकडे डिसेंबर अखेर नळदुर्ग अतिक्रमण मुक्त करण्याचा संकल्प न.प. प्रशासनाने केलेला असतानाच दुसरीकडे ही आकडेवारी समोर आल्याने पालिकेचा हा संकल्प कितपत यशस्वी होणार, याबाबत शंका व्यक्त होत आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील दळणवळणाचे केंद्र असलेले ऐतिहासिक शहर म्हणून नळदुर्गची ओळख आहे. वीस हजार लोकसंख्येच्या या शहराच्या नगर परिषदेत १७ नगरसेवक आहेत. तर साडेसहा चौरस किलोमिटर क्षेत्रफळावर हे शहर वसलेले आहे. ३४०० घरे असलेल्या या गावात २००१ नळ कनेक्शन अधिकृत तर ७५० अनधिकृत असल्याची माहिती न.प. सर्वेक्षणातून पुढे आली आहे. याशिवाय बसस्थानक परिसर, अक्कलकोट रोड, बसस्थानक ते किल्ला रोड, नानीमा दर्गा, किल्ला गेट या महत्वाच्या ठिकाणी १६५ नागरिकांची अतिक्रमणे असल्याची माहितीही सर्वेक्षणातून उघड झाली आहे.
दरम्यान, अतिक्रमण हटविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनीही सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिल्याने न.प.ने अतिक्रमण कंबर कसली आहे. अनधिकृत नळ कनेक्शन व अतिक्रमणाबाबत मुख्याधिकारी निंगण्णा पाटील म्हणाले की, सध्या पाणी टंचाई आहे. अशा परिस्थितीमध्ये शहरात ७५० नळ अनधिकृत आहेत. सदर नळ नियमित करुन घेवून थकबाकी वसूल करण्यात येणार आहे. शिवाय शहराला अतिक्रमणाच्या जखडातून मुक्त करण्यासाठी डिसेंबर अखेरपर्यंत मोहीम राबविली जाणार आहे. त्यापूर्वी नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घ्यावे व नळ कनेक्शन नियमित करुन घ्यावे, अन्यथा पाणी चोरीचा व शासनाचा महसूल बुडविल्याच्या फौजदारी गुन्ह्याला सामोरे जावे लागेल, असा इशाराही मुख्याधिकारी पाटील यांनी दिला आहे. (वार्ताहर)