सवंदगावात चार भावांची घरे आगीत जळून खाक
By Admin | Updated: May 12, 2015 00:55 IST2015-05-12T00:37:26+5:302015-05-12T00:55:16+5:30
सवंदगाव : गावापासून जवळ असलेल्या धुळे वस्तीवर रविवारी रात्री १०.३० च्या सुमारास लागलेल्या आगीत जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे.

सवंदगावात चार भावांची घरे आगीत जळून खाक
सवंदगाव : गावापासून जवळ असलेल्या धुळे वस्तीवर रविवारी रात्री १०.३० च्या सुमारास लागलेल्या आगीत जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
वस्तीवरील रावसाहेब किसन धुळे, कैलास रावसाहेब धुळे, भाऊसाहेब धुळे, राजाराम धुळे हे चारही कुटुंब बाहेर झोपलेले असताना त्यांच्या घरांना लागलेल्या आगीत कुटुंबाचा संपूर्ण संसार जळून खाक झाला. घटनेची माहिती कळताच तलाठ्याने घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. या कुटुंबियांना लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी या चारही पीडित कुटुंबियांनी केली आहे.
यावेळी भारत कदम, गंगाधर धुळे, पोलीस पाटील ए. एल. म्हस्के, नामदेव कदम, लक्ष्मण रुस्तुम धुळे, सोमीनाथ सोनवणे, एम. डी. कदम, भाऊनाथ धुळे, तुकाराम कवडे आदींची उपस्थिती होती़
गाडीचालकाला इजा नाही
घाटनांद्रा : मक्याचा कडबा दुसऱ्या शेतात बैलगाडीतून घेऊन जात असताना अचानक आग लागल्याने दोन्ही बैल आगीने होरपळून जखमी झाले. या आगीत पुंजाराम पल्हाळ यांना इजा झाली नाही़
पल्हाळ गव्हाळी शिवारातून त्यांच्याच बैलांना वैरण म्हणून मक्याचा कडबा बैलगाडीतून घेऊन जात होते़ पल्हाळ हे गाडीत कडबा असल्याने लाकडी जुवावर बसून बैलांना हाकलत होते. मागील बाजूने लागलेली आग त्यांच्या लक्षात आली नाही. बैलांना मागच्या बाजूने चटके बसत असल्याने बैल जोरात पळत होते. त्यामुळे आग भडकली.
रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतकऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी आरडाओरड केली व धावणाऱ्या बैलांना थांबवण्याचा प्रयत्न केला़ यानंतर पल्हाळ यांनी गाडीतून उडी मारली़ मात्र तोपर्यंत बैलांच्या मागील भागास चटके बसल्याने गंभीर जखमा झाल्या. या आगीत पल्हाळ यांना इजा झाली नाही. बैलांवर पशुवैद्यकीय अधिकारी धनंजय महाजन यांनी उपचार केले.
छपरास आग
घाटनांद्रा : येथील अहमद तडवी यांच्या शेतातील छपरास आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले़ रात्रीच्या वेळी लागलेल्या आगीमुळे जीवित हानी झाली नाही.
घराच्या पाठीमागे आग लागल्याने लक्षात आले नाही. छपरात ठेवलेले शेती उपयोगी व संसारोपयोगी साहित्य, रासायनिक खताच्या ८-१० बॅग, ठिबक सिंचनचे दोन एकरातील साहित्य, इलेक्ट्रिक मोटारपंप व आॅईल इंजिन, कांद्याचे तयार करून ठेवलेले बियाणे, लागवड करण्यासाठी खरेदी केलेले ५ क्विंटल अद्रकचे बियाणे व इतर साहित्य जळून खाक झाले.