परस्पर नव्या नियुक्त्या केल्याने काँग्रेसचे माजी अध्यक्ष नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 07:29 PM2020-08-07T19:29:10+5:302020-08-07T19:32:14+5:30
२४ जून रोजी औरंगाबाद जिल्हा काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांची, तर हिशाम उस्मानी यांची शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली.
- स.सो. खंडाळकर
औरंगाबाद : अलीकडेच झालेल्या काँग्रेसच्या जिल्हा व शहराध्यक्षांच्या नियुक्त्यांच्या वेळी आम्हाला अजिबात विश्वासात घेतले गेले नाही. परस्परच या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या, असा नाराजीचा सूर माजी जिल्हाध्यक्ष व माजी शहराध्यक्ष जाहीरपणे नाही; पण दबक्या आवाजात काढत आहेत. नव्या नियुक्त्या झाल्यानंतरच आम्हाला कळले, असे त्यांचे म्हणणे आहे.
२४ जून रोजी औरंगाबाद जिल्हा काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांची, तर हिशाम उस्मानी यांची शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. कोरोनाचे संकट चालू असताना असे काही बदल होतील, असे वाटत नसताना हे बदल घडवून आणण्याचे धाडस प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले. अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी अनिल पटेल यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाचा प्रभार सोपवला. ते केव्हा तरी बदलले जाणारच होते; परंतु हा बदल करताना साधे विचारलेसुद्धा नाही, अशी खंत मात्र पटेल यांना बोचत आहे. नामदेव पवार यांचीही अशीच खंत आहे. पक्षातील एक गट पवार यांच्यावर नाराज होता. तो बदल मागत होता; परंतु हा बदल करीत असताना पवार यांचे प्रदेश काँग्रेसमध्ये पुनर्वसन केले जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती; पण तसेही झाले नसल्याने पवार नाराज असल्याचे बोलले जात आहे.
कार्यकारिणी जम्बो राहील; पण बनवायला वेळ लागेल
काँग्रेसची शहर कार्यकारिणी जम्बो राहील. त्यात सर्व समाजघटकांना सामावून घेण्यात येईल; परंतु कोरोनामुळे या कामाला विलंब लागू शकतो, असे उस्मानी यांनी स्पष्ट केले. सध्या उस्मानी हे विविध समाजघटकांमधील कार्यकर्त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचे काम करीत आहेत. त्यात काही सेवानिवृत्त अधिकारीही आहेत. आतापर्यंत सुमारे शंभर नव्या कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
गांधी भवनाचे नूतनीकरण
नूतन शहराध्यक्ष हिशाम उस्मानी हे कामाला लागले आहेत. शाहगंज येथील पक्ष कार्यालय असलेल्या गांधी भवनाचे नूतनीकरण त्यांनी हाती घेतले आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेले हे काम आणखी महिना, दोन महिने चालेल. या कामावर सुमारे दहा लाख रुपये खर्च होणार असल्याचे उस्मानी यांनी सांगितले. गांधी भवनाचे छत सतत पडत असते. पावसाळ्यात गळत असते. ही सारी कामे सुरू करण्यात आली आहेत.