कडूलिंबाच्या झाडाला भाद्रपदमध्ये फुले
By Admin | Updated: September 3, 2014 01:09 IST2014-09-03T01:07:20+5:302014-09-03T01:09:34+5:30
देविसिंग राजपूत , येणेगूर पर्यावरणाच्या झालेल्या हानीमुळे बदललेल्या वातावरणाचा फटका सर्वच घटकांना सोसावा लागत आहे. याचा परिणाम जसा पावसावर झाला आहे. तसाच एकूणच ऋतुचक्रावर झाल्याचे दिसून येते.

कडूलिंबाच्या झाडाला भाद्रपदमध्ये फुले
देविसिंग राजपूत , येणेगूर
पर्यावरणाच्या झालेल्या हानीमुळे बदललेल्या वातावरणाचा फटका सर्वच घटकांना सोसावा लागत आहे. याचा परिणाम जसा पावसावर झाला आहे. तसाच एकूणच ऋतुचक्रावर झाल्याचे दिसून येते. कडूलिंबाच्या झाडाला फाल्गुन व चैत्र महिन्यात वर्षातून एकदाच फुले व फळांचा (लिंबोळ्या) बहर येतो. मात्र यावेळी कडूलिंबाच्या झाडाला भाद्रपद महिन्यात फुलांचा बहार आला आहे. येणेगूर परिसरातील शेतकरी निसर्गातील या बदलामुळे अचंबित झाले आहेत.
आयुर्वेदात कडूलिंबाच्या वृक्षाला अणन्य साधारण महत्व आहे. या वृक्षाची, साल, फुले, पाने, फळे (लिंबोळ्या) पानाच्या काड्या यापासून अनेक उपपदार्थ बनविले जाते. त्यामध्ये लिंबोळी अर्क, लिंबोळी पेंड, कडूनिंब तेल, लिंबोळी खत, भूनंबादी काढा आदी आयुर्वेदिक उपचारासाठी तयार केले जाते. त्वचा रोग, कृमिनाशक, पिकावर फवारणीसाठी आदी अनेक कारणासाठी या वृक्षाचा उपयोग केला जातो. मानवी जीवनाला निंब वृक्षाचे मोठे फायदे आहेत. हा कल्पवृक्ष म्हटले तरी वावगे ठरणार नाही. हिंदु समाजात चैत्रशुद्ध प्रतिपदेला (गुडी पाडवा) निंबफुले, हरभरा डाळ व गुळ यापासून पातळ पदार्थ बनवून घरातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्यदायक म्हणून पाजले जाते. ते अनादी कालापासून त्याचे अनुकरण प्रतिवर्षी केले जाते. म्हणूनच या वृक्षास कामधेनू असेही म्हटले जाते.
कडूलिंबाच्या झाडाला फाल्गुन व चैत्र महिन्यात वर्षातून एकदाच फुले व फळांचा (लिंबोळ्या) बहार येतो असा वर्षानुवर्षाचा अनुभव आहे. मात्र यंदा येणेगूर परिसरातील आष्टामोड, सुपतगाव, येणेगूर, नळवाडी शिवारातील काही झाडांना नवीन पालवी फुटून फुलांच्या तोरांची गुच्छे बहरल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. यासंदर्भात उमरग्याच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. व्ही.डी. देवरकर यांच्याशी संपर्क साधला असता, हा जणूकी बदल नसून वातावरणात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे ऋतुचक्र (उन्हाळा, हिवाळा, पावसाळा) सारखे पुढे जात असल्याचा परिणाम असल्याचे ते म्हणाले. सतत तीन ते चार वर्ष एखाद्या वृक्षाला वर्षातून दोनदा बहर येत असेल तो जनूकीय बदल असे म्हणता आले असते. मात्र लिंब वृक्ष निलेसी परिसरातील असून, अगादी रिक्टीका इंदिका असे वनस्पती शास्त्रीतील त्याचे नाव आहे. या परिवारातील वृक्षांना वर्षातून एकदाच फुले व फळे येतात असेही डॉ. देवरकर यांनी सांगितले.