नाशिकला पुन्हा पूर, मराठवाडा खुश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 01:02 IST2017-07-29T01:02:42+5:302017-07-29T01:02:42+5:30
पैठण : नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून शुक्रवारी सकाळपासून मोठ्या क्षमतेने विसर्ग वाढविण्यात आल्याने नांदूर-मधमेश्वर वेअरमधून जायकवाडीसाठी ४९,४७८ एवढ्या मोठ्या क्षमतेने विसर्ग करण्यात येत आहे.

नाशिकला पुन्हा पूर, मराठवाडा खुश
लोकमत न्यूज नेटवर्क
पैठण : नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून शुक्रवारी सकाळपासून मोठ्या क्षमतेने विसर्ग वाढविण्यात आल्याने नांदूर-मधमेश्वर वेअरमधून जायकवाडीसाठी ४९,४७८ एवढ्या मोठ्या क्षमतेने विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे गोदावरीला पुन्हा एकदा पूर आला असून, गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सकाळपासून जायकवाडी धरणात येणारी आवक ४,४१० क्युसेक होती. रात्री १० नंतर आवक वाढण्यास प्रारंभ झाला होता. शनिवारी धरणात ३० ते ४० हजार क्युसेक क्षमतेने आवक अपेक्षित असल्याचे धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले. धरणात येणारी आवक लक्षात घेता जायकवाडीच्या जलसाठ्यात मोठी वाढ होणार आहे. शुक्रवारी धरणात ४०.३२ टक्के इतका जलसाठा झाला होता.
नाशिक जिल्ह्यात गुरुवारी नाशिक ३२ मि.मी., त्र्यंबकेश्वर ४५ मि.मी., इगतपुरी ७६ मि.मी., घोटी ९८ मि.मी. व बसवंत पिंपळगाव ४० मि.मी. अशी पावसाची नोंद झाली होती.
दरम्यान, शुक्रवारीसुद्धा नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील धरणांपैकी गंगापूर धरण ५,१०९, दारणा धरण ६,६१०, पालखेड धरण १२,१३४, कडवा धरणातून ४,१७६ असा विसर्ग सकाळपासून करण्यात येत आहे. हे सर्व पाणी एकत्रित जमा होऊन नांदूर-मधमेश्वर बंधाºयातून गोदावरी पात्रात ४९,४७८ क्युसेक क्षमतेने विसर्ग करण्यात आला. यामुळे गोदावरीला मोठा पूर आला आहे.
जायकवाडी धरणात शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता पाणीपातळी १५०८.९३ फूट झाली होती. धरणात एकूण जलसाठा १६१३.४५६ दलघमी, तर जिवंत जलसाठा ८७५.३५० दलघमी एवढा झाला होता.