पहिल्याच पावसात रस्ता गेला वाहून
By Admin | Updated: June 22, 2015 00:19 IST2015-06-21T23:51:00+5:302015-06-22T00:19:44+5:30
येणेगूर : उमरगा तालुक्यातील आष्टा शिवारात १२ जून रोजी झालेल्या दमदार पावसामुळे आष्टा-अचलेर रस्त्याचा अर्धा भाग वाहून गेला आहे़

पहिल्याच पावसात रस्ता गेला वाहून
येणेगूर : उमरगा तालुक्यातील आष्टा शिवारात १२ जून रोजी झालेल्या दमदार पावसामुळे आष्टा-अचलेर रस्त्याचा अर्धा भाग वाहून गेला आहे़ त्यामुळे मागील आठवड्यापासून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून, शेतकऱ्यांसह नागरिकांची यामुळे गैरसोय होत आहे़
मागील काही वर्षापूर्वी आष्टा- अचलेर या रस्त्याचे काम करण्यात आले होते़ आष्टा परिसरात १२ जून रोजी दमदार पाऊस झाला़ रस्त्याच्या पूर्वेकडील भागात या पावसाचे पाणी साठले होते़ हे पाणी पश्चिमेकडील भागाने ओव्हरफ्लो होवून वाहून गेले़ पाण्याच्या प्रवाहात या रस्त्याचा अर्धा भाग वाहून गेला आहे़ ही घटना घडून नऊ दिवसांचा कालावधी लोटला तरी बांधकाम विभागाने पुलाच्या दुरूस्तीबाबत कोणत्याच हलचाली केलेल्या नाहीत़ या पुलाची दुरूस्ती व्हावी, यासाठी आष्टा येथील ओंकारप्पा सुलतानपुरे, उपसरपंच गंगाधर बलसुरे यांच्यासह ग्रामस्थांनी माहिती दिली होती़ मात्र, रस्त्याच्या दुरूस्तीकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे़ काही ठिकाणी केवळ पांढरे दगड टाकून देण्यात आले आहेत़ रस्ताच खराब झाल्याने बससेवाही बंद झाली आहे़ या भागातील प्रवाशांचेही हाल होत आहेत़ (वार्ताहर)