आॅनलाईन अर्ज भरण्याचा सर्वत्र फज्जा
By Admin | Updated: July 14, 2015 00:27 IST2015-07-14T00:27:09+5:302015-07-14T00:27:09+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी आॅनलाईन यंत्रणा कुचकामी ठरल्याने तसेच अर्ज कसा दाखल करायचा

आॅनलाईन अर्ज भरण्याचा सर्वत्र फज्जा
औरंगाबाद : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी आॅनलाईन यंत्रणा कुचकामी ठरल्याने तसेच अर्ज कसा दाखल करायचा याची माहिती नसल्याने इच्छुक उमेदवारांची चांगलीच फजिती झाली.
गंगापूर : तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतींच्या निवडणूक महासंग्रामाची सुरुवात झाली आहे़ या
निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही़ आॅनलाईन उमेदवारी अर्ज भरण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे; मात्र आॅनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा गंगापुरातही पूर्णपणे फज्जा उडाला आहे़
आयोगाच्या निर्देशाप्रमाणे यावेळी प्रथमच ग्रामपंचायत स्तरावर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना त्या त्या ग्रामपंचायत स्तरावर असलेल्या ‘संग्राम’मधील संगणकाद्वारे आॅनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत;मात्र आॅनलाईन उमेदवारी अर्ज भरण्याचा फज्जा उडाला असून, इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागात पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे व गलथान कारभारामुळे पहिल्याच दिवशी दणका बसला.
एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्यामुळे यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. तालुक्यातील ग्रामपंचायतींची परिस्थिती पाहता ग्रामीण भागात कुठल्याच प्रकारचे नेटवर्क वेळेवर मिळत नसल्याने, त्याचप्रमाणे वेळोवेळी खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे तूर्तास तरी ‘संग्राम’ यंत्रणा कुचकामी ठरत आहे.
ग्रामीण भागात या यंत्रणेने पाहिजे तशी प्रगती केली नसताना उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचे कुठल्याच प्रकारचे प्रशिक्षण न मिळालेल्या ‘संग्राम’ यंत्रणामध्ये निवडणूक लढविणाऱ्या नवख्या व अशिक्षित उमेदवारांची गळचेपी होताना दिसत आहे. शासनाने आॅनलाईन फॉर्म भरण्याचे आदेश दिले असताना तहसील कार्यालयातून मात्र ५० रुपयांप्रमाणे उमेदवारी अर्जाचे छापील फॉर्म विक्री होताना दिसत आहेत, तर आज दिवसभर गुंतागुंतीच्या आॅनलाईन फॉर्ममुळे तहसील कार्यालयात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. आॅनलाईन उमेदवारी भरण्यात उमेदवारांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.