तलावातील गाळ टाकून ९ एकर जमीन केली सुपीक
By Admin | Updated: June 2, 2015 00:24 IST2015-06-02T00:24:45+5:302015-06-02T00:24:45+5:30
वैजापूर : डोंगरकाठाशी निव्वळ खडकाळ असलेली नऊ एकर जमीन फुलविण्याचा निर्धार तालुक्यातील बोरसर येथील सधन शेतकरी दिलीप पवार यांनी केला आहे.

तलावातील गाळ टाकून ९ एकर जमीन केली सुपीक
वैजापूर : डोंगरकाठाशी निव्वळ खडकाळ असलेली नऊ एकर जमीन फुलविण्याचा निर्धार तालुक्यातील बोरसर येथील सधन शेतकरी दिलीप पवार यांनी केला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या खडकावर जलयुक्त शिवार अभियानातर्गंत सुरू असलेल्या पाझर तलावातील काढलेल्या गाळाचा खऱ्या अर्थाने त्यांनी सदुपयोग करून जमिनीची निर्मिती केली आहे.
वैजापूर तालुका हा कायम अवर्षणप्रवण म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील बोरसर परिसरही त्याला अपवाद नाही. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तालुक्यातील बोरसर या गावाची निवड झाली. या अभियानांतर्गत सिमेंट नालाबांधासह समतल चर खोदणे, बांधबंदिस्तीकरणाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. याशिवाय खोकरी नदीवर असलेल्या पाझर तलावातील जेसीबी यंत्राच्या साहाय्याने गाळ काढण्याचे कामही याच अभियानांतर्गत गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. पाझर तलावातील निघालेल्या गाळाच्या माध्यमातून शेतकरी दिलीप पवार यांनी अभिनव प्रयोग करण्याचे ठरवून त्यास मूर्तरूप दिले. यासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिनकर पवार यांनी पवार यांना मोठे पाठबळ दिले. दिनकर पवार यांच्या सहकायार्मुळे दिलीप पवार हे खडकाळ जमिनीवर शेती फुलविणार आहेत.
पवार यांना एकूण ३० एकर शेती आहे. दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या पवार यांना शेतीची आवड आहे. यातूनच त्यांनी वडिलोपार्जित असलेले शेतशिवार चांगलेच फुलविले आहे. डोंगरकाठाशी व पाझर तलावाच्या परिसरात त्यांचे वडिलोपार्जित ९ एकर क्षेत्र आहे. मात्र, हे क्षेत्र खडकाळ असल्याने कित्येक वर्षांपासून पडीकच होते. यापूर्वी सन २०१३ मध्ये शिवारातील गट क्र. ११५ मधील १५ एकर शेतजमीन त्यांनी याच प्रकारे विकसित केली. अभियानाच्या माध्यमातून तलावातील गाळ उपसा करून तो जर आपल्या शेतात टाकला, तर खडकाळ पडीक जमीन वापरात येईल व तलावाची साठवण क्षमताही वाढेल, या उद्दात हेतूने दिलीप पवार यांनी हालचाली सुरू केल्या. या खडकाळ व डोंगराळ क्षेत्राचे पहिले सपाटीकरण करून त्यात पाझर तलावातील गाळ टाकून शेतीलायक उत्तम जमिनीची निर्मिती केली. त्यांनी जेसीबी मशीनच्या साहाय्याने प्रथम सर्व जमिनीचे सपाटीकरण केले. सपाटीकरण करताना जमिनीतील खडक फोडण्यासाठी ब्लास्टिंग करावे लागले. जमिनीच्या उंच भागातील पाणी खालील भागात आणले.
सपाटीकरणानंतर त्यांनी शेजारच्या पाझर तलावातील गाळ उपसा करण्याचा मनोदय प्रशासनासमोर मांडला. त्यांच्या या प्रस्तावाला प्रशासनाने तात्काळ होकार दाखविल्याने पवार यांनी लगोलग जेसीबी मशीनद्वारे गाळ उपसा सुरू केला. त्यांनी तलावातून आतापर्यंत सुमारे १६ हजार ब्रास गाळ उपसा करून आपल्या खडकाळ जमिनीवर टाकून पसरविला. यासाठी त्यांचे एकूण अंदाजे १३ लाख रुपये खर्च झाले आहेत. दिलीप पवार यांनी मागील २ महिने अहोरात्र मेहनत घेऊन कधी एकेकाळी खडकाळ असलेल्या जमिनीचे शेतात रूपांतर केले आहे.
२या नव्याने तयार केलेल्या शेतात ते २ हजार फूट अंतराहून पाईपलाईनद्वारे पाणी आणणार आहेत. या ठिकाणीही ठिंबक सिंचन पद्धतीचा वापर करून पिके घेण्याचा त्यांचे नियोजन आहे. दरम्यान, त्यांच्या या अभिनव प्रयोगाची उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांनी भेट देऊन पाहणी करून त्यांच्या जिद्द व मेहनतीचे तोंडभरून कौतुक केले.
३ स्वत:च्या प्रगतीसोबत गावाचा विचार केल्यास त्याचा निश्चितच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही व अशा जलसंधारणाच्या कामातून गावेही टंचाईमुक्त झाल्याशिवाय राहणार नाहीत, असे मत साताळकर यांनी व्यक्त केले.