आकडे टाकून होतोय झगमगाट
By Admin | Updated: September 26, 2014 01:54 IST2014-09-26T00:42:45+5:302014-09-26T01:54:50+5:30
राजेश खराडे, बीड गणेश उत्सव व नवरात्रोत्सवाच्या दरम्यान शहरातील मंडळाकडून वीज चोरी केल्याने महावितरण कंपनीला लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

आकडे टाकून होतोय झगमगाट
राजेश खराडे, बीड
गणेश उत्सव व नवरात्रोत्सवाच्या दरम्यान शहरातील मंडळाकडून वीज चोरी केल्याने महावितरण कंपनीला लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
नवरात्रोत्सवाच्या कालावधीत मंडळाकडून आकर्षक रोषणाई करण्यावर भर दिला जातो. यासाठी मंडळाकडून अधिकृतपणे वीज घेणे आवश्यक असते. असे कनेक्शन देताना बील वसूल करण्याच्या दृष्टीने महावितरण कंपनीकडे अनामत रक्कम जमा करणे बंधनकारक असते. यंदा शहरात ५९ मंडळांनी नवरात्रोत्सवाची स्थापना केली आहे. यापैकी फक्त ४ मंडळांनी महावितरण कंपनीकडे नोंदणी केली असून अनामत रक्कम भरणा केली आहे. शहरातील उर्वरीत ५५ मंडळे ही अनाधिकृतपणे विजेचा वापर करीत असल्याने महामंडळाला या अतिरिक्त वीज बीलाचा फटका सहन करावा लागत आहे.
या सार्वजनिक उपक्रमाच्या दरम्यान अतिरीक्त वीज वापराचा फटका प्रत्यक्ष महावितरण कंपनीला सहन करावा लागत आहे. सार्वजनिक उत्सवात मंडळाच्या विद्युत वापराच्या अनुषंगाने महावितरण कंपनीकडे अनामत रक्कम जमा करणे हे बंधनकारक आहे. शहरातील खंडेश्वरी येथे दोन व इतर ठिकाणी सिंगल फेजचे दोन कनेक्शन अधिकृतपणे घेतले आहे. उर्वरीत मंडळांनी मात्र महावितरण कंपनी येथे नाव नोंदणी केलेली नाही.
शहरातील मंडळाकडून वीज चोरी केल्याने महावितरणाला लाखो रुपयाचा चुना लागत आहे. मंडळांना या सार्वजनिक उत्सवाच्या कालावधीत वीज दरात सवलत दिली जाते. मात्र शहरातील मंडळाकडून या सवलीतीचा उपभोग घेतला नाही.
वीज चोरी करणाऱ्या मंडळावर त्वरीत कारवाई करण्यात येणार असल्याचे अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे यांनी सांगितले.