चोरांची नव्हे, पोलिसांची भीती वाटते....
By Admin | Updated: May 29, 2014 00:29 IST2014-05-29T00:24:09+5:302014-05-29T00:29:59+5:30
विशाल सोनटक्के , उस्मानाबाद खाकीची रझाकारी अनुभवलेल्या कनगर्यात बुधवारी तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी केलेल्या अमानुष अत्याचाराची कहाणी अनेकजण कथन करीत होते.

चोरांची नव्हे, पोलिसांची भीती वाटते....
विशाल सोनटक्के , उस्मानाबाद खाकीची रझाकारी अनुभवलेल्या कनगर्यात बुधवारी तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी केलेल्या अमानुष अत्याचाराची कहाणी अनेकजण कथन करीत होते. पोलिसांच्या काठीने कोणाचे डोके फुटलेले तर कोणाचे गुडघे. त्यामुळे अनेकांना धड चालता अन् बसताही येत नव्हते. गावातील चिमुरडीही या हैदोसाने बिथरलेली होती. साहेब..आम्हाला चोरांची नव्हे आता पोलिसांची भीती वाटते, अशी भावना या ग्रामस्थांनी विशेष पोलिस महानिरीक्षकांपुढे बोलून दाखविली. उस्मानाबादपासून २५ किमी अंतरावर कनगरा हे गाव सुमारे ६००० लोकवस्ती असलेल्या या गावात अठरा पगड जातीची माणसं गुण्या-गोविंदाने राहतात. मागील काही वर्षात बचतगट चळवळीने जोर धरला आहे. या चळवळीचे वारे कनगर्यातही जोमाने वाहू लागले. बचतगटाच्या माध्यमातून गावातील महिला एकत्रित आल्या आहेत. या महिलांनीच गावात दारूबंदी व्हावी, यासाठी पुढाकार घेतला आहे. या अनुषंगानेच बेंबळी पोलिस ठाण्याला रीतसर निवेदनही देण्यात आले. मात्र गावात दारूविक्रीच होत नसल्याचा दावा पोलिसांनी केल्याने या महिला निराश झाल्या. घरातील कर्ते पुरुष दिवसभर काबाडकष्ट करतात आणि रात्री ढोसून येतात आणि तरीही पोलिस दारूविक्री होत नसल्याचा दावा करतात. मग ही दारू नेमकी येते कोठून याचा शोध घ्यायचा त्यांनी प्रयत्न सुरू केला. आणि यातूनच सोमवारी रात्री या महिलांनी दारूविक्रेत्याला मुद्देमालासह पकडून पोलिसांना फोन केला. पोलिस कारवाई करतील, अशीच या महिलांची भाबडी आशा होती. मात्र झाले उलटेच. महिलांच्या तक्रारीवरून आलेल्या पोलिसांनी दारू विक्रेत्यांची बाजू घेत, महिलांशी विसंवाद सुरू केला. ही दारू नव्हे, पाणी आहे, असे सांगत, दारूचा ड्रम सांडून टाकला. या प्रकाराने महिलाही संतापल्या. यातून बाचाबाची झाली. आणि प्रकरण हातघाईवर गेले. अडाणी अशिक्षित महिला पोलिसांना सुनावतात काय, असा खाकी वर्दीचा इगो जागा झाला. आणि पोलिसांनी थेट महिलांवर हात उगारला. या घटनेमुळे संतापलेल्या महिलांनी पोलिसांना मारहाण केली. झाला प्रकार बेंबळी पोलिस ठाण्याला समजताच तेथील सहायक पोलिस निरीक्षक राजेश बनसोडे सहकार्यांसह कनगर्यात आले. यावेळी महिलांसह संतापलेल्या ग्रामस्थांनी गाडीवर दगडफेक केली. ही माहिती पोलिस अधीक्षकांना समजल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी कडूकर यांच्यासह १०० पोलिस कनगर्यात दाखल झाले. आणि रात्री १ ते पहाटेपर्यंत गावातील प्रत्येक घरात घुसून पोलिसांनी हाती लागेल त्याला बेछूट मारहाण केली. अनेक जणांना बाहेर काय प्रकार घडलाय याची कल्पनाही नव्हती. दिसेल त्याला पोलिस बाहेर खेचून बदडत होते. दरवाजा ठोठावूनही ज्यांनी कडी उघडली नाही, तेथे दरवाज्यावर लाथा घालून पोलिसांनी घरात प्रवेश मिळविला आणि बाय-बापड्यांसह चिमुकल्यांनाही वेचून मारले. विशेष म्हणजे केवळ मारहाण करूनच पोलिस थांबले नाहीत तर सापडेल त्या अवस्थेत त्यांनी ग्रामस्थांना उस्मानाबादला नेऊन ग्रामीण पोलिस ठाण्यात डांबले. अशा १३५ जणाविरुद्ध गंभीर गुन्हेही दाखल करण्यात आले. मंगळवारी दुपारी या प्रकरणाला वाचा फुटली आणि मग शहरातील पत्रकार कनगर्याकडे रवाना झाले. तेथील परिस्थिती पाहिल्यानंतर सर्वांनाच घटनेचे गांभीर्य कळले. आणि मग अचानक खाकीच्या मिजासामध्ये असलेले पोलिस डिफेन्सीव मूडमध्ये आले. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी सारवासारव सुरू केली. आणि रात्रीच गंभीर गुन्हे दाखल केलेल्या ४२ ग्रामस्थांना पोलिसांनी सोडून दिले. बुधवारी नांदेडचे पोलिस महानिरीक्षक कनगर्यात दाखल झाले. त्यावेळी ग्रामस्थानी मांडलेल्या व्यथा-वेदनांनी उपस्थितही अवाक झाले होते. गुडघ्याची वाटी सरकली मोटार रिवायडिंगचा व्यवसाय करणार्या सतीश गुरव यांना महिन्याकाठी पाच हजाराचे उत्पन्न मिळते. कमविता व्यक्ती एक आणि खाणारी तोंडे पाच. पोलिसांनी केलेल्या मारहाणीत गुरव यांच्या गुडघ्याची वाटी सरकली असून, आता ते अंथरुणावर खिळून आहेत. गुडघ्यावरील शस्त्रक्रियेसाठी दमडी नाही वर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा असल्याचे माळकरी असलेल्या गुरव यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी सांगितले. मारहाण करून पोलिसांनी २४ तास कोठडीत डांबले. त्यानंतर थातूर-मातूर उपचार करून गावात सोडले. मोडलेला पाय घेऊन घरी परतलेल्या गुरव यांना आपला दोष काय असा प्रश्न सतावत आहे. कसलीही विचारपूस न करता पोलिसांनी जनावरांस बदडल्यागत काठीने सोलून काढले. वृद्ध वडिलांना का मारता म्हणून विचारत बाहेर आले असता, त्यांच्याही कानशिलात भडकावल्याचे सतीश गुरव यांनी सांगितले. गडंगण खाल्ले अन् मारही... कनगर्यातील शफीक याचे गुरुवारी लग्न आहे. या सोहळ्यासाठी कोल्हापूरहून पाहुणे मंडळी कनगर्यात आली आहेत. सोमवारी रात्री दाखल झालेल्या या मंडळींना गावातील नातेवाईकांनी गडंगण जेवणासाठी बोलाविले. जेवण करून घरी आलेली ही मंडळी गप्पा मारत असताना अचानक पोलिस घरात घुसले आणि नवर्या मुलासह घरातील सर्वांनाच त्यांनी पोलिसी लाठीचा प्रसाद दिला. आम्ही इथे कोणीच राहत नाही. लग्नासाठी कोल्हापूरहून आल्याचे सांगत, पोलिसांच्या मारहाणीत झालेल्या जखमा अमिना मैनोद्दीन शेख हिने दाखविल्या. घरातीलच ८५ वर्षाच्या गफूर अब्दुल शेख यांनाही पोलिसांनी झोडपल्याचे त्या म्हणाल्या. गफूर यांना वयोमानामुळे धड चालताही येत नाही मात्र तरीही पोलिसांनी त्यांना सोडले नाही, असे सांगत, असे पोलिस आम्ही पहिल्यांदाच पाहतोय, असेही त्या म्हणाल्या. अंधारात केवळ दारूचा वास मध्यरात्री पोलिसांनी दरवाजावर लाठ्या मारायला सुरुवात केली. दरवाजा उघडेपर्यंतही पोलिसांना दम नव्हता. लाथा घालून पोलिस घरात घुसले घरात प्रवेश केल्याबरोबर लाईट बंद करून मारहाण करायला सुरुवात केली. या प्रकाराने घरातील सर्वच जिवाच्या आकांताने ओरडू लागले. अंधारात कोण, कशासाठी मारतोय हेही कळत नव्हते. फक्त दारूचा उग्र वास येत होता. बेदम मारहाण करून बाहेर खेचत नेल्यावर, हे चोरटे नव्हेत तर पोलिस असल्याचे लक्षात आले, असे हसन शेख याने सांगितले. अंगावरचा शर्ट काढत पाठीवर झालेल्या जखमा दाखवित तो म्हणाला, ज्यांनी दार उघडले नाही, त्यांचे दरवाजे तोडले आणि दरवाजे तुटले नाहीत, त्यांच्या घरावर चढून घराचे पत्रे उचकटून पोलिस आतमध्ये शिरले. साहेब..माफ करा, लेकराला सोडून पळाले रात्री २ च्या सुमारास आम्ही सगळेच गाढ झोपी गेलो होतो. अचानक धरा..पकडा..मारा..असा आवाज सुरू झाला. काय होतयं हे समजायच्या अगोदरच दरवाज्यावर थाप पडली. दरवाजा उघडण्यासाठी मतिमंद असलेला माझा मुलगा गेला. आणि दरवाजा उघडल्याबरोबर पोलिसांनी त्याच्या कानशिलात भडकावली. हा प्रकार पाहून आम्ही घराबाहेर पडलो. पाहतो तर पोलिस दिसेल त्याला चोप देत होते. जिवाच्या आकांताने आम्ही शेताकडे पळालो. घरात मतिमंद असलेला एकटा मुलगा राहिलाय, हे माहिती असूनही, माफ करा साहेब..पण मला माझा जीव प्यारा वाटला, अशा शब्दात उल्फत लतीफ पठाण या महिलेने आपली व्यथा मांडली. दोन एकर शेतीवर कुटुंबाची गुजराण होते. कोणाच्या अध्यात-न्-मध्यात नसतानाही हे भोगावं लागलं, असं ती धाय मोकलून सांगत होती. विनवणी...पप्पांना सोडा, घरात मी एकटीच ! विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनाही पोलिसी अत्याचार पाहून धक्का बसला. पीडितांशी संवाद साधत असताना, इयत्ता आठवीत शिकत असलेली पूजा संजय धज ही तावडे यांच्यासमोर आली. आणि काही बोलण्याअगोदरच धाय मोकलूून रडू लागली. आई-वडिलांसोबत पत्र्याचे शेड असलेल्या घरात झोपले होते. मध्यरात्री पोलिसांनी दरवाजा ठोठावला. दार उघडण्यास उशीर लागताच दरवाजा उघडा नाही तर लाईटचे मीटर फोडतो, असे सुनावले. आम्ही तिघेही दरवाजाकडे गेलो. वडिलांनी दार उघडताच एकाने त्यांच्या गचोटीला धरून त्यांना बाहेर खेचले. तर दुसर्याने मला लाथ मारली. वडील सालगडी आहेत. पोलिस त्यांना उस्मानाबादला घेऊन गेलेत. वडिलांना सोडविण्यासाठी आई सुद्धा तिकडेच असल्याचे सांगत, कनगर्यात एकटीच असलेल्या पूजाने टाहो फोडला. हा प्रकार पाहून तावडे यांच्यासह उपस्थित गहिवरून गेले.