शेतकऱ्यांना रक्कम अदा होईल- टोपे
By Admin | Updated: May 18, 2015 00:17 IST2015-05-18T00:04:40+5:302015-05-18T00:17:50+5:30
जालना : जिल्हा मध्यवर्ती बँकेला दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी १३८ कोटी रुपये प्राप्त झाले होते. पैकी १२७ कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहेत

शेतकऱ्यांना रक्कम अदा होईल- टोपे
जालना : जिल्हा मध्यवर्ती बँकेला दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी १३८ कोटी रुपये प्राप्त झाले होते. पैकी १२७ कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहेत. उर्वरित ७ कोटी जमा करताना तांत्रिक अडचणी येत आहेत. असे असले तरी ही रक्कम शेतकऱ्यांना अदा केली जाईल, अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अंकुशराव टोपे यांनी दिली.
जिल्ह्याला राज्य सरकारकडून दुष्काळी अनुदानाचे २२३ कोटी रुपये प्राप्त झाले असून, त्यातील १३८ कोटी जिल्हा प्रशासनाने मध्यवर्ती बँकेकडे टप्प्याटप्प्याने वर्ग केले होते. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी राजकीय हेतुने जे आरोप केले त्यात तथ्य नसल्याचेही टोपे यांनी सांगितले आहे. जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेने नेहमीच शेतकऱ्यांचे हित जपण्याला प्राधान्य दिले असून, आपल्या संचालक मंडळाच्या कार्यकाळात बँकेने नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेचे नेटवर्थ (नक्तमुल्य) २७ कोटी २७ लाख असून, सीआरएआर (भांडवली प्राप्ती मर्यादा) ९.६७ टक्के एवढा आहे. बँकेचा निव्वळ एनपीए शून्य टक्के असून, आर्थिकदृष्ट्या बँकींग क्षेत्रात याला मोठे महत्त्व आहे.
जालना जिल्ह्यात सन २०११-१२ मध्ये पीकविम्याच्या हप्त्यापोटी ३ कोटी २३ लाख रुपयांचा विमा हप्ता कृषी इंश्युरंन्स कंपनीकडे भरला होता. या हप्त्यापोटी ७२ कोटी ७९ लाख रुपये शेतकऱ्यांना मिळाले होते. गेल्या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १४ कोटी ६५ लाख (खरीप हंगाम विमा हप्ता) रुपये भरला असून, त्यातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५३० कोटी ६४ लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळायला हवे होते. मात्र, प्रत्यक्षा १९० कोटी एवढी कमी रक्कम मिळणार असल्याचे संकेत आहेत. राज्य सरकार शेतकऱ्यांचे हित जोपासण्याची जी खोटी ग्वाही देत आहे, त्यात तथ्य नसून, कृषी विमा कंपनीकडे राज्य सरकारने ७०० कोटी भरले असते तर १९० कोटी रुपयांपेक्षा जास्तीचे विमा संरक्षण मिळाले असते, असेही टोपे यांनी सांगितले. लोणीकर यांनी बँकेच्या अनुदान वाटपातून, व्याज कपात केल्याचा आरोप केला आहे. त्यातही तथ्य नसून तो केवळ राजकीय स्वार्थ असल्याचे नमूद करण्यात आले. बँकेला जिल्हा प्रशासनाची कुठलीही नोटीस अथवा कार्यवाहीचा इशारा देण्यात आला नसून, पालकमंत्री लोणीकर यांनी तथ्य तपाासूनच आरोप करावेत, असेही टोपे यांनी स्पष्ट केले आहे.माजी मंत्री आ. राजेश टोपे हे या बँकेच्या दैनंदिन व्यवहारात कधीच ढवळाढवळ करत नाहीत. मात्र, ज्या ज्या वेळी मध्यवर्ती बँकेला सरकार दरबारी बाजू मांडायची असल्यास त्यांचे नेहमीच सहकार्य मिळते, असेही ते म्हणाले.