शेतकऱ्यांची दमछाक
By Admin | Updated: June 20, 2014 00:45 IST2014-06-19T23:43:21+5:302014-06-20T00:45:03+5:30
संजय तिपाले , बीड महावितरणने कृषीपंपांचे पाच कोटींचे वीजबिल माफ केले असून जिल्ह्यातील १४ हजार ९५३ शेतकरी त्यासाठी पात्र ठरले आहेत़ मात्र, निकष पूर्ण करताना शेतकऱ्यांची अक्षरश: दमछाक होऊ लागली आहे़

शेतकऱ्यांची दमछाक
संजय तिपाले , बीड
गारांसह झालेल्या पावसाच्या तडाख्याने शेतातील उभी पिके नेस्तनाबूत झाले़ त्यानंतर गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईसोबतच सहा महिन्यांचे वीज माफ करण्याचा निर्णय झाला़ त्यानुसार महावितरणने कृषीपंपांचे पाच कोटींचे वीजबिल माफ केले असून जिल्ह्यातील १४ हजार ९५३ शेतकरी त्यासाठी पात्र ठरले आहेत़ मात्र, निकष पूर्ण करताना शेतकऱ्यांची अक्षरश: दमछाक होऊ लागली आहे़
जिल्ह्यात फेबु्रवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात अवकाळी पावसाचे आगमन झाले़ पुढे मार्च महिन्यातील १५ तारखेपर्यंत अवकाळी पाऊस मुक्कामी होता़ गारांसह झालेल्या या पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नांवरच पाणी फेरले़ हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकऱ्यांचा संसार पुरता विस्कटून गेला़ कापूस, ज्वारी, गहू, हरभरा ही उभी पिके आडवी झाली़
याशिवाय कुक्कुटपालन, शेळीपालन अशा उद्योगांनाही याचा फटका बसला़ महत्त्वाचे म्हणजे या काळात वीज पडून बारा शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता़ पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वीजबिलमाफीचा लाभ देण्याचे निश्चित झाले़
१४ जानेवारी ते १४ जून या सहा महिन्यांच्या कालावधीतील कृषीपंपांची वीजबिले माफ केली आहेत़ त्यानुसार पहिल्या टप्प्यात बीड उपविभागातील ५ हजार २८१ शेतकऱ्यांचे ७६ लाख ७५ हजार १० रुपये व अंबाजोगाई उपविभागातील ९ हजार ६७२ शेतकऱ्यांचे एक कोटी ५७ लाख ८२ हजार ४३८ रुपयांचे वीजबिल माफ केले आहे़ एकूण दोन कोटी ३४ लाख ५७ हजार ४४८ रुपयांची वीजबिल माफी शेतकऱ्यांना मिळाली आहे़
दुसऱ्या टप्प्यातील वीजबिलमाफीसाठी निधी मागविला आहे़ निधी येताच त्याचा लाभ शेतकऱ्यांना देता येईल, अशी माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे यांनी दिली़
पुरावे दिले तर वीजबिल माफ
अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे म्हणाले, ज्यांचे नाव गारपिटग्रस्तांच्या यादीत आहे, त्यांच्या नावे कृषीपंपाची जोडणी आहे का? याचीखातरजमा करुनच वीजबिल माफ केले जात आहे़ नुकतेच वरिष्ठ कार्यालयाने एक परिपत्रक काढले आहे़
त्यानुसार मीटर दुसऱ्याच्या नावे असेल तरीही वीजबिल माफीचा लाभ घेता येऊ शकतो़ त्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित महावितरण कार्यालयाशी संपर्क करावा़ आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन वीजबिल माफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले़
शेकडो शेतकरी वंचित
वीजबिलमाफीचा लाभ देण्यासाठी महावितरणने महसूलकडून पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या मागविल्या़ त्यानंतर या यादीतील शेतकऱ्यांच्या नावे कृषीपंपाची जोडणी आहे का? याची खातरजमा केली़ मात्र, काही शेतकऱ्यांची जमीन एकाच्या नावे तर कृषीपंपाची जोडणी तिसऱ्या नावे आहे़ खरेदी- विक्री व्यवहारामुळे देखील जमीन व विद्युतमीटर यांचा ताळमेळ लागला नाही़ परिणामी शेकडो शेतकरी वीजबिलमाफीपासून वंचित राहिले आहेत़ पुरावे गोळा करताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे़ वीजबिलमाफीपासून कोणीही वंचित राहू नये़ लाभ सरसकट देण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे बाळासाहेब जटाळ यांनी केली आहे़
अशी मिळाली वीजबिलमाफी
तालुका शेतीपंप वीजबिल
बीड १५५३ २३,१९,६१७
गेवराई २१४५ ३०,७४,०७७
आष्टी ४५२ ६,८५,६७७
पाटोदा २३० ४१,९७९८
शिरुर ९०१ ११,७५,८३९
अंबाजोगाई ६२३६ १,०९,३,९६८
परळी १८७१ ३२,२१,०२४
केज १८३ २,६०,९९२
माजलगाव ५४३ ८,२७,१२५
धारुर २५६ ३,५९,६१४
वडवणी ५८३ १०,१९,७१२