शेतकऱ्यांनी पूरक जोडधंदे करावेत

By Admin | Updated: January 7, 2015 01:05 IST2015-01-07T00:43:14+5:302015-01-07T01:05:32+5:30

औरंगाबाद : शेतकऱ्यांनी खोटी प्रतिष्ठा व अनावश्यक गरजांचा हव्यास बाळगणे सोडावे. शेतीसोबत पूरक जोडधंद्याची कास धरल्यास शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल व आत्महत्या टाळता येतील,

Farmers should make complementary connections | शेतकऱ्यांनी पूरक जोडधंदे करावेत

शेतकऱ्यांनी पूरक जोडधंदे करावेत

औरंगाबाद : शेतकऱ्यांनी खोटी प्रतिष्ठा व अनावश्यक गरजांचा हव्यास बाळगणे सोडावे. शेतीसोबत पूरक जोडधंद्याची कास धरल्यास शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल व आत्महत्या टाळता येतील, असा सूर दर्पण दिनानिमित्त आयोजित परिसंवादात निघाला.
दर्पण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्रविद्या विभाग आणि एमजीएम वृत्तपत्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रसार माध्यमे आणि ग्रामीण वास्तव’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. रेखा शेळके यांनी केले. प्रमुख वक्ते म्हणून ‘आयबीएन लोकमत’चे वृत्तसंपादक राजेंद्र हुंजे, ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब, अशोक तुपे यांची उपस्थिती होती.
यावेळी अमर हबीब म्हणाले की, ग्रामीण भागात फक्त प्राथमिक शिक्षणापर्यंत मुलींचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. उच्च शिक्षणात मात्र ९० टक्के गळतीचे प्रमाण आहे. ग्रामीण भागातील लोकांमध्ये स्थलांतराचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहे, ही मोठी शोकांतिका आहे. स्वत:ची क्षमता सिद्ध करण्याची ताकद आज शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये जास्त आहे. डॉ. वि. ल. धारूरकर म्हणाले की, भारत हा खेड्यांचा देश आहे. प्रसारमाध्यमांनी खेड्यात जाऊन तेथील प्रश्न समजून घेण्याची गरज आहे. खेड्यातील बातम्यांचे प्रतिबिंब वर्तमानपत्रांमध्ये उमटत नाही, तशी चर्चा माध्यमे करीत नाहीत.
‘आयबीएन लोकमत’चे वृत्तसंपादक राजेंद्र हुंजे म्हणाले की, माध्यमांनी ग्रामीण वास्तव समोर आणले आहे. माध्यम म्हणजे कायदेमंडळ नसून त्यांनासुद्धा मर्यादा आहेत. आपण जेव्हा शहरात जातो, तेव्हा तेव्हा आपण गावाला विसरतो. गावातील वास्तवाचे भान आपण ठेवले पाहिजे. अशोक तुपे म्हणाले की, आजची पत्रकारिता ही फक्त चित्रपटातील गप्पा गोष्टी आणि राजकारण यावरच भाष्य करण्यावर भर देत आहे. ग्रामीण भागातील प्रश्न मांडणारी पत्रकारिता ही बोटावर मोजण्याएवढीच शिल्लक आहे. या कार्यक्रमास प्राध्यापक डॉ. आशा देशपांडे, प्रा. सत्यजित जाधव, प्रा. बाळासाहेब गायके आदींसह विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. प्रा. जयदेव डोळे यांच्या मनोगताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

Web Title: Farmers should make complementary connections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.