‘शेतकरी निवासस्थानां’ची दुरवस्था !

By Admin | Updated: March 19, 2015 00:17 IST2015-03-19T00:10:28+5:302015-03-19T00:17:51+5:30

पणन महामंडळाने राज्यातील बाजार समित्यांना आता महिला शेतकरी भवन निर्माण करण्याच्या सूचना केल्या आहेत़ या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी यापूर्वीच

Farmers' residences' deterioration '! | ‘शेतकरी निवासस्थानां’ची दुरवस्था !

‘शेतकरी निवासस्थानां’ची दुरवस्था !


पणन महामंडळाने राज्यातील बाजार समित्यांना आता महिला शेतकरी भवन निर्माण करण्याच्या सूचना केल्या आहेत़ या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी यापूर्वीच लातूर, उदगीर, अहमदपूर बाजार समितीने तयार केलेल्या शेतकरी भवनाचे स्टींग केले असता, दुर्दशा निदर्शनास आली़ याठिकाणी निवास तर सोडाच क्षणभर थांबणेही धाडसाचेच ठरेल, इतके वाईट हाल शेतकरी भवनाचे झाले आहेत़ लातूरच्या शेतकरी निवासाची वास्तू बाहेरून देखणी दिसते. मात्र आतून अवकळाच आहे.
लातूरनंतर जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ म्हणून उदगीरच्या बाजार समितीचा लौकिक आहे़ येथील आडते, व्यापारी, हमाल, मापाडी अन् कारभाऱ्यांनी निर्माण केलेल्या विश्वासामुळे केवळ उदगीर परिसरातूनच नव्हे तर सीमावर्ती भागातूनही मोठ्या प्रमाणात कृषीमालाची आवक असते़ आंध्रप्रदेशातील मुक्रमाबाद पासून ते कर्नाटकाच्या बीदरपर्यंतच्या शेतकऱ्यांसाठी उदगीरची बाजारपेठ वरदान ठरली आहे़ याठिकाणी दूर अंतराहून शेतकरी शेतमाल घेऊन येतात़ हंगामामध्ये रांगा लागत असल्याने अनेकांच्या शेतमालाचे वजन होत नाही़ किंबहुणा रात्री उशिरापर्यंत त्यांना थांबावे लागते़ ही बाब लक्षात घेता बाजार समितीने शेतकऱ्यांच्या मुक्कामासाठी अल्प दरात निवासाची सोय शेतकरी भवनाच्या माध्यमातून केली़ परंतु, कालांतराने या भवनाच्या डागडुजीकडे व सुविधांकडे दुर्लक्ष होत गेल्याने शेतकऱ्यांना याठिकाणी मुक्काम करणे गैैरसोयीचे ठरु लागले़ परिणामी शेतकऱ्यांची संख्या कमी होत गेल्याने बाजार समितीने या भवनाकडे पूर्णपणे कानाडोळा केला़
आता तर या शेतकरी भवनाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे़ आत प्रवेश करताच लागणारा एक मोठा हॉल गळतीने हैराण आहे़ वर पत्र्याचे छत असल्याने जागोजागी गळती सुरु असते़ त्यामुळे भिंतीवरचा रंग उडून आत पाणी मुरत आहे़ शेजारीच असणाऱ्या निवासाच्या खोल्यांची पाहणी केली असता त्या धुळीने माखल्या होत्या़ एकही खाट दिसून आले नाही़ काही ठिकाणी पंखे गायब तर काही मोडकळीस आलेले होते़ बहुतांश ठिकाणे जाळ्यांनी वेढलेली होती़ इतकेच नव्हे तर झाडाच्या मुळाही भिंतीतून उगवलेल्या दिसून आल्या़ काही खोल्यांच्या मध्ये व व्हरांड्यात भंगार अस्ताव्यस्तपणे टाकलेले निदर्शनास आले़ येथील स्वच्छतागृहाची अवस्था तर अत्यंत वाईट बनली आहे़ दारे मोडून पडली आहेत़ आतील भाग धुळ व जाळ्यांनी माखला आहे़ अशा स्थितीत शेतकरी भवनात कोणता शेतकरी मुक्कामास जाईल, हे बाजार समितीच जाणो !
लातूरच्या बाजारपेठेचा राज्यात गवगवा असला तरी शेतकऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या शेतकरी निवासासाठी कुठलीही सुविधा नसल्याने आहे ते सभागृह दुरावस्थेच्या विळख्यात सापडले आहे़ त्यामुळे आडत बाजारात माल घेवून येणारा शेतकरी मुक्कामी राहणार तरी कुठे, असा प्रश्न निर्माण होत आहे़ नवीन जागेत सुसज्ज सुविधा असणारे शेतकरी निवास एमआयडीसी भागात उभारण्याचे स्वप्न शेतकऱ्याला दाखविले जात असले तरी सध्याच्या परिस्थितीत तरी शेतकरी निवास दुरावस्थेच्या विळख्यात आहे़
लातुरात शेतकरी निवास तळमजल्यावर तर शौचालय व स्नानगृह वरच्या मजल्यावर करण्यात आलेले आहे़ कॅन्टींगची सोय तर नाहीच. परंतु, आहे त्या शेतकरी निवासात शेतकरी येतच नाहीत.
सुरुवातीला शेतकऱ्यांच्या निवासाची चांगली व्यवस्था आहे, असे विश्वासाने सांगणारे बाजार समितीचे सचिव हंगरगे यांना आतील अवस्थेचे वर्णन सांगताच त्यांनी आता शेतकरीच मुक्कामाला येत नसल्याचे सांगितले़ कोणीही मुक्कामाला येत नसल्यास विनाकारण खर्च कशाला वाढवायचा, असे काटकसरी मत त्यांनी मांडले़ तसेच गरजेनुसार शेतकऱ्यांच्या बैठका, हमाल-मापाड्यांच्या कार्यक्रमासाठी भवनाचा हॉल उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे सांगितले़ शासनाचे निर्देश पाळावेच लागतील असे सांगून, महिलासांठी शेतकरी भवन सध्याच्याच भवनाच्या वरच्या मजल्यावर करता येईल का, याची चाचपणी सुरु असल्याचेही हंगरगे म्हणाले़

Web Title: Farmers' residences' deterioration '!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.