अवकाळी पावसामुळे बिघडले शेतकर्यांचे गणित
By Admin | Updated: May 23, 2014 01:10 IST2014-05-23T00:44:07+5:302014-05-23T01:10:34+5:30
परभणी : यावर्षी जिल्ह्यात अकराही महिने पाऊस झाला. या अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले. पावसामुळे रबी हंगामाची पूर्णत: नासाडी झाली

अवकाळी पावसामुळे बिघडले शेतकर्यांचे गणित
परभणी : यावर्षी जिल्ह्यात अकराही महिने पाऊस झाला. या अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले. पावसामुळे रबी हंगामाची पूर्णत: नासाडी झाली असून शेतकर्यांचे सर्व गणिते या बिघडविले आहेत. शेती व्यवसायाला बेभरोशाचा व्यवसाय संबोधले जाते. निसर्गावर आधारित असलेला हा कृषी व्यवसाय आतापर्यंत पावसाच्या बेभरवशामुळे संकटात येत होता. यावर्षी मात्र अवकाळी पावसानेच या कृषी व्यवसायावर नांगर फिरविले आहेत. मागील वर्षी मुबलक प्रमाणात पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकर्यांच्या रबी हंगामावर मोठ्या आशा होत्या. परंतु, मार्च, एप्रिल या महिन्यात अवकाळी पावसाबरोबरच गारपीटही झाली. या संकटात जिल्ह्यातील रबी पिकांचे नुकसान झाले. यावर्षी पाच लाख हेक्टरवर रबीची पेरणी झाली होती. अवकाळी पावसामुळे अर्ध्याअधिक रबीचे क्षेत्र नुकसानग्रस्त झाले. विशेष म्हणजे रबीचे पिके काढणीला आली होती आणि त्यापूर्वीच अवकाळी पावसाने दगा दिला. या संकटातून शेतकरी अजूनही सावरलेला नाही. (प्रतिनिधी)परभणी जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ८५० मि.मी. एवढी आहे. मागील काही वर्षांचा अनुभव पाहता सरासरी देखील कशी-बशी पूर्ण होते. परंतु, मागच्या पावसाळी हंगामात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. जून ते डिेसेंबर २०१३ या महिन्यांमध्ये १ हजार १७२.६ मि.मी. पाऊस झाला आहे. तर जानेवारी ते डिसेंबर या काळात १२१६.१ मि.मी. पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे पावसाळ्याचे दिवस वगळता जानेवारी २०१४ ते मे २०१४ या काळात १२९.५० मि.मी. एवढा अवकाळी पाऊस झाला. पावसाळी हंगामामध्ये सरासरी ३० ते ३५ दिवस हे पावसाचे असतात. परंतु, यावर्षीच्या पावसाळ्यात मात्र ६१ दिवस पावसाचे राहिले. तर जानेवारी ते डिसेंबर या संपूर्ण वर्षामध्ये ६५ दिवस पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे जानेवारी २०१४ ते मे २०१४ या पाच महिन्यांमध्ये दहा दिवस पाऊस झाला. या काळात १२९.५ मि.मी. पावसाची नोंद झाली.