अन्न सुरक्षेचे धान्य शेतकऱ्यांना मिळेना
By Admin | Updated: December 14, 2015 23:53 IST2015-12-14T23:52:44+5:302015-12-14T23:53:04+5:30
जालना : दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी अन्न सुरक्षा योजना लागू करण्यात आलेली आहे.

अन्न सुरक्षेचे धान्य शेतकऱ्यांना मिळेना
जालना : दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी अन्न सुरक्षा योजना लागू करण्यात आलेली आहे. असे असले तरी, या योजनेंतर्गत जिल्ह्यातील अनेक स्वस्तधान्य दुकानावर धान्य मिळण्यास अडचणी येत आहेत. आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात कसबसे धान्य वाटपानंतर परिस्थिती पुन्हा जैसे थेच झाली आहे. पुरवठा विभाग व स्वस्तधान्य दुकानदारांमुळे धान्य मिळणे जिकिरीचे झाले आहे.
यंदा तर संपूर्ण खरीप हंगामच हातचा गेल्याने संकटात आणखीच भर पडली.अन्न सुरक्षे योजनेंतर्गत २ रुपये प्रतिकिलो गहू तर ३ रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ देण्याचा निर्णश शासनाने घेतला आहे. यासाठी वेगळे नियोजनही करण्यात आले आहे. मात्र या योजनेसाठी धान्यच कमी येत असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. आठही तालुक्यात मिळून १२८८ स्वस्तधान्य दुकानातून अन्न सुरक्षेचे धान्य पुरवठा करण्याच्या सूचना आहेत. दुकानांची संख्या मोठी असली तरी अनेक दुकाने परस्परांना जोडलेली अथवा काही दुकाने निलंबित आहेत. लाभार्थ्यांनुसार सर्व दुकानांना धान्य पुरवठा करण्यात येत असल्याचा दावा पुरवठा विभाग करत असला तरी शेतकऱ्यांना या दराने धान्य मिळतेच असे नाही. अनेकदा हे धान्य जादा दराने विक्री केले जाते. अन्न सुरक्षेचे धान्याचे होणारे नियतन कमी होत असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यातील सुमारे ११ लाख ९६ हजार लाभार्थींना दरमहा ३० हजार क्विंटल गहू तर २० हजार क्विंटलपेक्षा अधिक तांदळचा पुरवठा केला जातो. नियमित लाभार्थींसाठीच काही वेळा पुरवठा कमी होतो.
जिल्ह्यातील स्वस्तधान्य दुकानदारांना सुलभ धान्य पुरवठा व्हावा, या हेतूने सुरू करण्यात येणारी द्वारपोच अन्नपुरवठा योजना पुन्हा लालफितीत अडकली आहे.
४स्वस्तधान्य दुकानदारांना तालुका ठिकाणच्या गोदामात येऊन धान्य घेऊन जावे लागते. हे धान्य वाहतूक करताना अनेक अडचणी येतात. काही वेळा धान्य पुरवठाही कमी होतो. काही वेळेस धान्य मिळत नाही, काळा बाजार आदींचा सामना रेशन दुकानदारांना करावा लागतो. एकूणच स्वस्त धान्याचा काळा बाजार रोखावा, धान्य गावात वेळेत पोहचावे यासाठी शासनाने द्वारपोच धान्य पुरवठा योजना सुरू केली. मात्र ही योजना लालफितीच्या कारभारात अडकली असल्याचे चित्र आहे.