रानडुकरांमुळे शेतकरी संकटात
By Admin | Updated: February 20, 2015 00:08 IST2015-02-19T23:57:54+5:302015-02-20T00:08:30+5:30
शिरुर अनंतपाळ : दुष्काळाच्या चक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांसमोर आता नवे संकट उभे टाकले आहे़ दिवसरात्र एक करुन जोपासलेल्या रबी पिकांवर रानडुकरांचे हल्ले सुरु झाले आहेत़

रानडुकरांमुळे शेतकरी संकटात
शिरुर अनंतपाळ : दुष्काळाच्या चक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांसमोर आता नवे संकट उभे टाकले आहे़ दिवसरात्र एक करुन जोपासलेल्या रबी पिकांवर रानडुकरांचे हल्ले सुरु झाले आहेत़ रात्रीतून उभी पिके फस्त होत असल्याने शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळीसुद्धा पिकांचे संरक्षण करण्यासाठी खडा पहारा देण्याची वेळ आली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़
यंदा अल्प पर्जन्यमान झाले आहे़ परिणामी, रबीची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली नाही़ एकुण ११ हजार हेक्टर्सपैकी ५ ते ६ हेक्टर्समध्ये रबी ज्वारी, गहू, हरभरा, करडई, सूर्यफुल, भूईमुग, मका अशी पिके घेण्यात आली आहेत़ ज्या शेतकऱ्यांना पाणी पुरवठ्याची सुविधा आहे, असे शेतकरी दिवसरात्र एक करुन रबी पिकांची जोपासना करीत आहेत़ या पिकांवर रान-पाखरांचे थवेच्या थवे उतरत असून, रान-पाखरे सुद्धा पिकांचे मोठे नुकसान करीत आहेत़ विशेषत: ज्वारी, गहू यांचे टपोरे दाणे फस्त करीत आहेत़ त्यातच आता या पिकांवर नवे संकट आले आहे़ रानडुकरे रात्रीच्यावेळी ज्वारी, गहू, भूईमूग आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत़ त्याचबरोबर उभे पिक फस्त करीत आहेत़ ज्वारीची कणसे, गव्हाच्या तोरंब्या, भूईमूगाच्या शेंगा खाऊन शेती ओसाड करीत आहेत़ त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत़ दिवसा येणाऱ्या रान-पाखरांचा बंदोबस्त करण्यासाठी दिवसभर शिवारात पाखरे हाकरण्याचा आवाज येत असून, गोफणी भराभर फिरत आहेत़ परंतु रानडुकरांचे हल्ले कसे थांबवावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे़ (वार्ताहर)