दुष्काळ निवारणासाठी शेत तेथे शेततळे-मुख्यमंत्री
By Admin | Updated: September 2, 2015 23:34 IST2015-09-02T23:34:07+5:302015-09-02T23:34:07+5:30
बीड : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी शासन कटीबध्द आहे. पाणी, चारा व रोजगार उपलब्ध करून दुष्काळावर मात करण्यात येईल,

दुष्काळ निवारणासाठी शेत तेथे शेततळे-मुख्यमंत्री
बीड : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी शासन कटीबध्द आहे. पाणी, चारा व रोजगार उपलब्ध करून दुष्काळावर मात करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. शेत तेथे शेततळे करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून त्यांनी दुष्काळग्रस्त बीडकरांना दिलासा दिला.
बुधवारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची थेट बांधावर जाऊन पाहणी केली. पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांशी थेट संवादही साधला. रात्री त्यांचा ताफा बीडमध्ये आला. विश्रामगृहात अल्पशा विश्रांतीनंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, पालकमंत्री पंकजा मुंडे, खा. रजनी पाटील, खा. प्रीतम मुंडे, आ. जयदत्त क्षीरसागर, आ. विनायक मेटे, आ. लक्ष्मण पवार, आ. आर. टी. देशमुख, आ. भीमराव धोंडे, आ. संगीता ठोंबरे यांची उपस्थिती होती. मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, अधीक्षक अनिल पारसकर, सीईओ नामदेव ननावरे, अधीक्षक कृषी अधिकारी रमेश भताने उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी आमदारांनी आपापल्या भागातील दुष्काळी परिस्थिती मांडली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, मराठवाड्यातील चार जिल्ह्यावर कोसळलेले संकट मोठे आहे. संकटाचे रूपांतर संधीत करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येतील. अत्यल्प पाऊस असल्यामुळे खरीपाची पिके वाया गेली आहेत. दुष्काळ असल्यामुळे मागेल त्याला काम दिले जाईल. सिंचनाची रखडलेली कामे पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कामाचा वेग दुपटीने वाढला पाहिजे, असे त्यांनी बजावले. (प्रतिनिधी)