शेतकरी झाला हवालदिल

By Admin | Updated: June 25, 2014 00:35 IST2014-06-25T00:10:10+5:302014-06-25T00:35:57+5:30

परभणी : यंदा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पावसाने हजेरी न लावल्याने खरिपाची पेरणी खोळंबली आहे़ या निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत

A farmer would be havoc | शेतकरी झाला हवालदिल

शेतकरी झाला हवालदिल

परभणी : यंदा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पावसाने हजेरी न लावल्याने खरिपाची पेरणी खोळंबली आहे़ या निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत असल्याने जिल्ह्यातील खरिपाची पेरणी खोळंबली आहे़ तसेच शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घेऊन ठेवले बी-बियाणे घरात पडून आहेत़ पाऊस पडत नसल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे दिसून येत आहे़
जिल्ह्याचे खरीप हंगामाचे क्षेत्र ५ लाख २९ हजार २१० हेक्टर एवढे आहे़ आतापर्यंत केवळ ३ टक्के म्हणजे ९ हजार हेक्टरवर बागायती कपाशीची लागवड करण्यात आली आहे़ ज्या शेतकऱ्यांकडे पैसा आहे त्या शेतकऱ्यांनी गत आठवड्यात खत, बी-बियाणे खरेदी करून ठेवली आहेत़ अद्यापपर्यंत बाजारातील ५० टक्के बी-बियाणे व खताची विक्री झाली आहे़ ज्या बागायतदार शेतकऱ्यांनी कपाशी व सोयाबीनची लागवड केली आहे, त्या शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीची वेळ येते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे़ येत्या चार-पाच दिवसात पाऊस न पडल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे़ गत आठवड्यात वादळी वाऱ्यासह अभाळ आल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या़ परंतु, पावसाचा शिडकावाच झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उदासिनता आहे़ (प्रतिनिधी)
व्यापारीे हतबल
परभणी येथील नवा मोंढा येथील दुकानांत दोन दिवसांपासून शेतकरी बी-बियाणे खरेदीसाठी फिरकनासे झाले आहेत़ त्यामुळे कृषी दुकानदारांना शेतकऱ्यांची वाट पाहताच दुकानांमध्ये बसावे लागत आहे़ अशी प्रतिक्रिया येथील कृषी दुकानदार सोपान शिंदे यांनी लोकमतशी बोलताना दिली़
शेतकारी संकटात
गतवर्षी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकरी देशोधडीला गेला़ यंदा मात्र पाऊसच पडत नसल्याने शेतकरी चारही बाजुंनी संकटात सापडला आहे़ जून महिना संपत आला तरीही पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांनी आता कसे जगावे, असा गहन प्रश्न निर्माण झाला आहे़ शासनस्तरावरून उपाययोजना करणे गरजेचे आहे़
आश्रोबा कवडे-
पांढरगळा, ता़ जिंतूर
पशूपक्षी हवालदिल
पाऊस नसल्यामुळे शेतकरी तर सोडाच परंतु, पशूपक्षी देखील हवालदिल झाले आहेत़ सर्वत्र सन्नाटा पसरला असून, गावात, शेतात कुठेही मन लागत नाही़ उन्हाळ्यासारखी अवस्था पावसाळ्यात झाली आहे़ चार-आठ दिवसात पाऊस न पडल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे़
आत्माराम कुटे
वडी, ता़ पाथरी
निसर्गाचा प्रकोप
मृग नक्षत्र संपले असून, पाऊस नसल्याने पेरणी झालेली नाही़ महागामोलाचे बियाणे घरात पडून आहेत़ शेतात पाय ठेवण्याचीही इच्छा होत नाही़ गतवर्षी पावसाने तर यावर्षी पावसाविना शेतकरी त्रस्त झाला आहे़ निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे़
सखाराम रासे, कोठा, ता़ जिंतूर

Web Title: A farmer would be havoc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.