एक एकरात सधन झाला शेतकरी
By Admin | Updated: July 1, 2014 01:05 IST2014-07-01T00:43:03+5:302014-07-01T01:05:54+5:30
फकिरा देशमुख , भोकरदन केवळ एक एकर शेतीमध्ये दोन जिल्ह्यात फुलांच्या व्यवसायाचा विस्तार करून वालसा खालसा येथील एका शेतकऱ्याने तालुक्यात सधन शेतकरी म्हणून ओळख निर्माण करून एक आदर्श निर्माण केला आहे.

एक एकरात सधन झाला शेतकरी
फकिरा देशमुख , भोकरदन
केवळ एक एकर शेतीमध्ये दोन जिल्ह्यात फुलांच्या व्यवसायाचा विस्तार करून वालसा खालसा येथील एका शेतकऱ्याने तालुक्यात सधन शेतकरी म्हणून ओळख निर्माण करून एक आदर्श निर्माण केला आहे.
सुभाष पुंडलिक जाधव असे या शेतकऱ्याचे नाव आहे. जाधव यांनी पत्नी सिंधूबाई यांच्या सहाय्याने एक एकर शेतीमध्ये नियोजन केल्याने २० एकरची शेती करणाऱ्या शेतकऱ्याची आर्थिक बाबतीत बरोबरी करण्याचा प्रयत्न केला आहे. सुभाष जाधव यांच्या शेतजमिनीचे क्षेत्र एक एकर दहा गुंठे एवढे आहे. एवढ्या कमी क्षेत्रात काय करावे, असा प्रश्न सर्वप्रथम त्यांना पडला. कारण आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असल्याने व निसर्गाच्या लहरीपणामुळे या शेतीत काय पीक निघू शकेल, या विचाराने त्यांच्यासमोर फुलांच्या शेतीचा पर्याय उभा राहिला.
२० गुंठ्यामध्ये त्यांनी गुलाबाची सहाशे झाडे लावली. तर गुंठ्यात गलांडा, काही भागात निशीगंधा आणि उर्वरित क्षेत्रात तुरीची झाडे, पपई, १० गुंठ्यात कपाशी लावली. एकाच एकरमध्ये वेगवेगळे पीक घेऊन आपल्या कुटुंबियाच्या उदरनिर्वाहासह आर्थिक प्रगतीकडे त्यांनी केलेली वाटचाल सद्यस्थितीत शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण करणारी आहे. जाधव यांच्या शेतातील गुलाबाची फुलांची बाग सजलेली आहे. दररोज ५०० फुलांची विक्री होते. फुलांचे पार्सल एस.टी. बसद्वारे बुलढाण्याला पाठविण्याची कल्पनाही त्यांचीच. दररोज फुलांचे पार्सल भोकरदन येथून बुलढाण्याला तसेच तालुक्यातील काही गावांमध्ये पाठविले जाते. फुले खरेदी करणाऱ्यांची एक यादी त्यांनी तयार केली असून दररोज फुलांचे पार्सल मिळते किंवा नाही, याची खात्रीही ते संबंधितांकडे दूरध्वनीद्वारे संपर्क साधून करतात. सध्या पाऊस नसल्याने पपईऐवजी २० गुंठ्यात कपाशीवरच त्यांनी भर दिला आहे.
सुभाष जाधव व सिंधूबाई जाधव यांनी दूर अंतरावरून डोक्यावर पाणी आणून गुलाबाची बाग जगविली आहे. मुले दीपक, अमोल आणि गजानन या तिघांनाही पदवीपर्यंतचे शिक्षण देऊन आपल्या मेहनतीचे फळ केवळ व्यवसायातच नव्हे, तर कुटुंबाच्या शैक्षणिक प्रगतीतही त्यांनी मिळवून दाखविले आहे. जाधव यांचे वार्षिक उत्पन्न पाच लाखांच्या घरात आहे.
२० गुंठ्यामध्ये त्यांनी गुलाबाची सहाशे झाडे लावली. तर गुंठ्यात गलांडा, काही भागात निशिगंधा आणि उर्वरित क्षेत्रात तुरीची झाडे, पपई, १० गुंठ्यात कपाशी लावली. एकाच एकरमध्ये वेगवेगळे पीक घेऊन आपल्या कुटुंबियाच्या उदरनिर्वाहासह आर्थिक प्रगतीकडे त्यांनी केलेली वाटचाल सद्यस्थितीत शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण करणारी आहे.