नकली राष्ट्रवादामुळे लोकशाहीला धोका

By Admin | Updated: March 28, 2016 00:14 IST2016-03-28T00:05:21+5:302016-03-28T00:14:20+5:30

उस्मानाबाद : ज्यांनी जाती व्यवस्था व अस्पृश्यता निर्माण केली, टिकवून ठेवली, समर्थन केले त्यांनाच यापुढील काळात या व्यवस्थेची झळ सोसावी लागणार आहे.

False nationalism leads to democracy threat | नकली राष्ट्रवादामुळे लोकशाहीला धोका

नकली राष्ट्रवादामुळे लोकशाहीला धोका


उस्मानाबाद : ज्यांनी जाती व्यवस्था व अस्पृश्यता निर्माण केली, टिकवून ठेवली, समर्थन केले त्यांनाच यापुढील काळात या व्यवस्थेची झळ सोसावी लागणार आहे. जाता जात नाही ती जात असे म्हटले जात असले तरी भारतीय जात व्यवस्थेचे आयुष्य आता फार वर्ष टिकणार नाही. बुद्ध धम्माचा वेगाने प्रसार होत असून, बुद्ध धम्मातच जातीय व्यवस्था मोडीत काढण्याची क्षमता असल्याचे पाली भाषेचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. विमल किर्ती यांनी सांगितले. सध्याच्या परिस्थितीत नकली राष्ट्रवादामुळे देशातील लोकशाही तसेच धर्मनिरपेक्षतेसमोर मोठे आव्हान उभे राहिल्याचा इशाराही डॉ. कीर्ती यांनी दिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्ताने शहरातील लेडीज क्लबच्या मैदानावर आयोजित दुसऱ्या धम्म परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विचार मंचावर परिषदेचे अध्यक्ष, दलित पँथरचे संस्थापक ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले, भिक्खू ग्यानरक्षित (औरंगाबाद), भक्खू सुमेधची नागसेन, यशपाल सरवदे, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष यु. व्ही. माने, पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश पोतदार, सचिव विशाल सोनटक्के यांच्यासह फकिरा दलाचे प्रदेशाध्यक्ष सतीश कसबे, डॉ. सुधीर शिंदे, अमरसिंह ढाका आदींची उपस्थिती होती.
केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात बौद्ध धम्म वेगवने विस्तारत आहे. उत्तर, दक्षिण भारतात कुर्मी, शाक्य, मौर्य समाज मोठ्या संख्येने धम्माकडे वळत आहेत, कारण हा धम्म वैज्ञानिक असून, त्याबरोबरच सामाजिक समता, न्याय, स्त्री-पुरुष समानता मानणारा आहे. किंबहूना तोच त्याचा पाया असल्याने या मानवतावादी धम्माचे नव्या अभ्यासू पिढीला आकर्षण वाटत आहे. या धम्मात मनुष्य हा विचारांच्या, चिंतनाच्या केंद्रस्थानी आहे. असेही डॉ. कीर्ती यांनी सांगितले. महाराष्ट्रातही धम्म परिवर्तनाची लाट येत आहे. अशा परिस्थितीत दैनंदिन जीवनामध्ये धम्माचे काटेकोर आचरण करण्याची आवश्यकता असून, जो व्यक्ती धर्म व कर्मकांडातून मुक्त होतो तो आपल्या सर्वांगिण विकासासाठी योगदान देतो. बौद्ध धम्म हा वैज्ञानिक मुल्यांवर आधारीत त्यामुळे कितीही मोठे संकट आले तरी ते थोपविण्याची वैचारिक क्षमता धम्मात असल्याचेही त्यांनी सांगितले.
भारताच्या कुठल्याही भागात जावा जेथे तुम्हाला भिक्खु व बौद्ध बांधव दिसणार नाही असा एकही प्रांत मिळणार नाही. त्याकाळी ३३ बौद्ध धम्माची विश्वविद्यालये भारतात स्थापन केली होती. आता प्रत्येक गावात तसेच शहराच्या विभागात विहार उभारण्याची आवश्यकता असून, सर्वांना सोबत घेवून या धम्माचा प्रसार व प्रचार केल्यास भारतातील जाती व्यवस्था नष्ट होण्यास मदत होर्ईल, असा विश्वासही डॉ. कीर्ती यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले की, प्रत्येकांनी अष्टांग मार्ग व पंचशील या मार्गाचा अवलंब केला तर निश्चितपणे मनुष्याच्या जगण्याची उंची वाढेल. धम्माने दिलेल्या विचाराकडे कानाडोळा झाल्याने घराघरात कलह निर्माण होत आहेत. अशा स्थितीत महामानवाने दिलेल्या विचारांप्रमाणे आचरण करणे आवश्यक असून, शिक्षणावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्यामध्ये झोकून दिले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.
बीड येथील ओबीसी संघटनेचे अमरसिंह ढाका यांचेही यावेळी भाषण झाले. हनुमंतराव उपरे यांनी आम्हाला बुद्धाचा मार्ग दाखविला असून, त्याच पावलावर पाऊल टाकून आमची वाटचाल सुरु असल्याचे ते म्हणाले. बौद्ध धम्म हा मूळ भारताचा धम्म आहे, हे ओबीसी समाजाला समजावून सांगण्याची आवश्यकता असल्याचेही अमरसिंह ढाका यावेळी म्हणाले. (प्रतिनिधी)
यशपाल सरवदे यांनी आपल्या भाषणात, तेर येथील प्राचिन महत्व ओळखून तेथे भव्य चैत्यगृह उभारण्याची आवश्यकता व्यक्त केली. धम्म परिषदेच्या आयोजनात सातत्य ठेवावे असे आवाहनही त्यांनी केले. तर प्रास्ताविकात नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत यांनी या परिषदेच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. प्रारंभी क्रांती चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाची मिरवणूक काढण्यात आली. या रॅलीमध्ये जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

Web Title: False nationalism leads to democracy threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.