पाणावलेले डोळे आभाळाकडे
By Admin | Updated: July 6, 2014 00:15 IST2014-07-06T00:01:48+5:302014-07-06T00:15:55+5:30
भास्कर लांडे, हिंगोली मृग सरला, आर्द्राही कोरड्या गेल्या पण पावसाचा रूसवा गेलेला नाही. शेतकऱ्यांजवळचा चारा संपला पाणवठे कोरडे पडले. परिणामी जनावरांचे पोट पाठीला गेले.
पाणावलेले डोळे आभाळाकडे
भास्कर लांडे, हिंगोली
मृग सरला, आर्द्राही कोरड्या गेल्या पण पावसाचा रूसवा गेलेला नाही. शेतकऱ्यांजवळचा चारा संपला पाणवठे कोरडे पडले. परिणामी जनावरांचे पोट पाठीला गेले. वर्षानुवर्षाप्रमाणे यंदाही सावकाराच्या पैशांवर घेतलेल्या बियाण्याला किडे लागण्याची वेळ आली. तरीही वरूण राजाची वक्रदृष्टी कायम राहिली. दरवर्षी या वेळेत कोळपणी करणारा शेतकरी यंदा पाणावलेल्या डोळ्याने आभाळाकडे पाहत आहे.
मराठवाड्यात नांदेडनंतर सर्वाधिक पाऊस हिंंगोली जिल्ह्यात पडतो. गतवर्षी १२ जूनला आलेल्या मान्सूनने पावसाळ्यात थांबण्याचे नाव घेतले नव्हते. मागील अनुभव पाहता कृषी विभागाने खरिपासाठी खत-बियाण्यांचे नियोजन केले. यंदा ३ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रावर होणाऱ्या पेरणीसाठी २५ हजार २०० पेक्षा अडीच अधिक असा हजार मेट्रीक टन खत मागविला. दरम्यान, २० हजार २५० मेट्रीक टन खत वाटपही केला. त्यातील युरिया आणि डीएपीचा तुटवडाही भरून काढला. दुसरीकडे कापसाच्या बियाण्याला कोणी विचारिनाशे झाले. तर तूर, मूग, उडीद आदी पिकांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटून सोयाबीनचे ४० हजार हेक्टर क्षेत्र वाढले. वाढलेल्या क्षेत्रासाठी बियाणे कमी पडण्याची शक्यता असल्याने सोयाबीन बियाण्यांचा काळा बाजार होण्याची भीती निर्माण झाली होती. कारण गतवर्षी काढणीच्या हंगामात आलेल्या पावसामुळे सोयाबीनला बाधा पोहचली होती. परिणामी नामांकित कंपनींच्या बियाण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापीटा सुरू असताना मृग निगाला. या नक्षत्रातील पहिल्याप्रमाणे दुसरा आठवडा कोरडा गेल्याने शेतकऱ्यांच्या आशा आर्द्रावर एकवटल्या. आर्द्रात उजाडला तो दिवस सारखाच निघत असताना ६ जुलैै रोजी पुनर्वसू नक्षत्राला सुरूवात होईल. दरम्यान, पावसाने पडण्याचे नाव घेतले नसल्याने शेतकरी हवालदिल झाला. गतवर्षी ३ जुलैैपर्यंत जिल्ह्यात २८८ मिमी पाऊस पडला होता. त्याआधी लवकरच पावसास सुरूवात झाल्याने पेरणी आटोपून पंधरवडा उलटला होता. गतवर्षी यावेळेला कोळपणी, खत, निंदणी, फवारणी करणारा उत्पादक यंदा पावसाचा धावा करताना दिसतो. कारण ४ जुलैैपर्यंत २३८ मिमी पावसाची गरज असताना केवळ २२ मिमी पाऊस झाला.
याच पावसावर काही शेतकऱ्यांनी धुळ पेरणीचा डाव साधण्याचा प्रयत्न केला; पण पावसानेच दडी मारल्याने पेरणीचा डाव उलटल्याने एक-एक शेतकरी लाख-लाख रूपयांना बुडाला. अधिच सावकाराच्या कर्जावर घेतलेले महागामोलाचे बियाणे वाया गेल्याने उत्पादकांचे कंबरडे मोडल्यासरखे झाले. त्यातच उन्हाचा पारा कायम राहिल्याने विहिरी तसेच बोअरने तळ गाठला. मोजकाच असलेला चारा संपला, जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला. दुष्काळाचे सावट निर्माण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला. उन्हाळ्यात थोड्याश्या पाण्यावर लागवड केलेला कापूस वाळू लागला. त्यातच दुबार पेरणीचे संकट ओढवलेल्या उत्पादकांनी पावसासाठी धावा सुरू केला. सरसगट ही स्थिती असल्याने यंदा पावसाऐवजी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी पहावयास मिळाले.
२०१४ मधील पावसाचे नक्षत्र
नक्षत्र दिनांकवाहन मृग८ जून हत्ती
आर्द्रा२२ जून मोर
पुनर्वसू६ जुलै गाढव
पुष्य२० जुलै मेंढा
आश्लेषा३ आॅगस्ट उंदीर
मघा १६ आॅगस्ट कोल्हापूर्वा ३० आॅगस्ट मोर
उत्तरा १३ सप्टेंबर घोडा
हस्त २७ सप्टेंबर बेडूक
चित्रा १० आॅक्टोबर म्हैस
स्वाती २४ आॅक्टोबर घोडा
दुबार पेरणीचे संकट
मृग नक्षत्रात पाऊस झाल्याने हिंगोली तालुक्यातील आंबाळा-७० टक्के, आंबाळा तांडा-७०, बोंडाळा, वेलुरा, वडद, एकांबा, भिंगी, फाळेगाव, आडगावात अनुक्रमे ४० टक्के पेरण्या झाल्या होत्या; परंतु पावासाने दडी मारल्याने या गावात निघालेली पिके वाळली. लाखो रूपये खर्च करून महागामोलाचे खत-बियाणे वाया गेली. मृग नक्षत्राच्या पावसावर खेळलेला जुगार उत्पादकांच्या चांगलाच अंगलट आला. परिणामी लाखो रूपयांना बुडाल्याची भावना अंबाळा येथील नामदेव इंगोले, नामदेव लांडगे, नारायण इंगोले, अशोक भिसे, कडुजी इंगोले, भीमा भिसे, धम्मराज सावंत, विलास भिसे, पृथ्वीराज सावंत, झनक भिसे यांनी व्यक्त केली.
आपत्कालीन पीक नियोजन
मान्सून लांबल्याने उत्पादकांनी कोणती पिके घ्यावीत आणि कोणती पिके घेवू नयेत, असा सल्ला दिला जात आहे. १५ जून ते ७ जुलैपर्यंत खरीप हंगामातील सर्व पिके घेता येतात. ८ ते १५ जुलैै-कापूस, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, तूर, तीळ, सूर्यफुल. १६ ते ३१ जुलैै- बाजरी, सुर्यफुल, तूर+सोयाबीन (+ आंतरपीक), बाजरी +तूर, एरंडी+धने, एरंडी+तूर. १ ते १५ आॅगस्ट- बाजरी, सुर्यफुल, तूर, एरंडी+तीळ+बाजरी, एरंडी+धने, एरंडी+तूर. १६ ते ३१ आॅगस्ट- बाजरी, सुर्यफूल, तूर, एरंडी+धने, एरंडी+तूर आणि धने.
कोणती पिके आता घेवू नयेत...
८ ते १५ जुलैै- भुईमूग, मूग, उडीद. १६ ते ३१ जुलैै-कापूस, ज्वारी, भुईमूग. १ ते १५ आॅगस्ट- कापूस, ज्वारी, भुईमूग. १६ ते ३१ आॅगस्ट- कापूस, ज्वारी, भुईमूग, तीळ.