शेतकऱ्यांचे पावसाकडे डोळे
By Admin | Updated: June 15, 2014 00:34 IST2014-06-15T00:10:11+5:302014-06-15T00:34:21+5:30
नांदेड : शेतकऱ्यांनी नांगरणी, वखरणी आदी मशागतीची कामे पूर्ण करुन खत-बी-बियाणाची खरेदी केली. आता बळीराजा आकाशाकडे डोळे करुन पावसाची प्रतीक्षा करीत आहे.
शेतकऱ्यांचे पावसाकडे डोळे
नांदेड : शेतकऱ्यांनी नांगरणी, वखरणी आदी मशागतीची कामे पूर्ण करुन खत-बी-बियाणाची खरेदी केली. आता बळीराजा आकाशाकडे डोळे करुन पावसाची प्रतीक्षा करीत आहे.
यंदा जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ७ लाख ६५ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून यापैकी सोयाबीनची ३ लाख तर कापसाची २ लाख २५ हजार हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. बी-बियाणाच्या दरात गतवर्षीपेक्षा जवळपास दीडपटीने वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांची बियाणे खरेदी करताना चांगलीच दमछाक होत आहे. यावर्षी कापसाच्या बियाणाचे दर टिकून असले तरी सोयाबीनच्या बियाणामध्ये बऱ्याच अंशी वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना खरेदी करताना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.
ज्या प्रमाणात बियाणाच्या दरात वाढ झाली त्या तुलनेत शेतमालाचे दर अत्यल्प वाढले आहेत.मृग नक्षत्र सुरु होऊनही आठ दिवसांचा कालावधी झाला आहे. मात्र अद्यापही पावसाने हजेरी लावली नाही. तापमान उन्हाळ््यासारखेच जाणवत असल्याने अंगाची लाहीलाही होत असून शेतकऱ्यांसह सर्वच जणांना आता पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
यंदा राज्यात मान्सून लवकर दाखल झाला तर पेरण्या वेळेवर ्आटोपणार आहेत. अन्यथा पेरण्याला उशीर झाला तर हंगाम चांगला येत नाही. यावर्षी जून महिना अर्धा संपत आला असतांना अजूनही पावसाचा पत्ता नाही. यामुळे पेरण्या वेळेवर होणार की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.
गतवर्षी जून महिन्यात पाऊस पहिल्याच आठवड्यात पाऊस बरसल्याने काही भागात पेरण्यालाही लवकरच प्रारंभ झाला होता. मात्र यावर्षी अद्याप पावसाचे वातावरणही तयार झालेले नाही.
कापूस तसेच सोयाबीनला उत्पादन खर्चावर आधारित मिळत असलेला अत्यल्प भाव यामुळे बहुतांश शेतकरी हरभरा व अन्य पिकांना पसंती देत आहेत. यावर्षी तरी कापसाच्या दरामध्ये चांगली वाढ होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र कृषिमूल्य आयोगाने कापसाला प्रतिक्विंटल केवळ ५० रुपये दरवाढ जाहीर करुन उत्पादकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. (प्रतिनिधी)