निवडणूक निकालाबाबत कमालीची उत्कंठा

By Admin | Updated: May 14, 2014 23:59 IST2014-05-14T23:12:37+5:302014-05-14T23:59:42+5:30

जालना : जालना व परभणी या दोन लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आघाडी विरूद्ध महायुतीच्या उमेदवारांतील प्रतिष्ठेच्या तुल्यबळ लढतीचा शुक्रवारी मतमोजणीतून निर्णय लाणार आहे.

Extremely passionate about election results | निवडणूक निकालाबाबत कमालीची उत्कंठा

निवडणूक निकालाबाबत कमालीची उत्कंठा

जालना : जालना व परभणी या दोन लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आघाडी विरूद्ध महायुतीच्या उमेदवारांतील प्रतिष्ठेच्या तुल्यबळ लढतीचा शुक्रवारी मतमोजणीतून निर्णय लाणार असून, राजकीय क्षेत्रासह शहरी व ग्रामीण भागाचेही या निर्णयाकडे पूर्णत: लक्ष केंद्रित झाले आहे. जालना व परभणी या दोन्ही मतदारसंघात चुरशीच्या लढती रंगल्या होत्या. या दोन्हीही लढतीत काँग्रेस आघाडी व महायुतीने सर्व शक्ती पणास लावली. विशेषत: उमेदवारांनी जीवाचे रान केले. विद्यमान खा. रावसाहेब दानवे पाटील (महायुती) व विलास औताडे (काँग्रेस आघाडी) यांनी जालन्यातून, तर आ. संजय जाधव (महायुती) व विजय भांबळे (काँग्रेस आघाडी) या प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवारांनी परभणीतून मोठी रणधुमाळी उडवून प्रचंड चुरस निर्माण केली. या प्रतिस्पर्ध्यांच्या रंगलेल्या लढतीने दोन्ही मतदारसंघातील संपूर्ण वातावरण अक्षरश: ढवळून निघाले होते. राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठांसह नव्या पिढीतील पदाधिकारी-कार्यकर्त्यांनीही या निवडणुकीचे अनन्यसाधारण महत्त्व ओळखून उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे समर्थन उभे केले. त्यामुळेच शहरी व ग्रामीण भाग अक्षरश: पेटून निघाला. शहरी भागापासून खेडोपाडी, वाडी-तंड्यापर्यंत किमान पंधरा दिवस या तुल्यबळ निवडणुकीचाच विषय चर्चेत होता. ठिकठिकाणी प्रतिस्पर्धी उमेदवारांचे ‘प्लस’ व ‘मायनस’ पॉर्इंट, मतविभागणी तसेच पडद्याआड किंवा पडद्यावरच्या खेळ्या, कुरघोड्यांसंदर्भात जाहीरपणे गप्पा रंगल्या होत्या. या दोन्ही मतदारसंघात रणधुमाळीने कळस गाठल्याने पूर्णत: निवडणूकमय वातावरण झाले होते. तरूणांपासून ते अबालवृद्ध व महिलांमधूनसुद्धा निवडणूक एके निवडणूक एवढीच चर्चा राहिली. विशेषत: ऐन लग्नसराईच्या हंगामात रंगलेल्या तुल्यबळ लढतीचा लग्नसराईवर, दैनंदिन व्यवहारासह अन्य गोष्टींवरसुद्धा तीव्र परिणाम उमटल्याचे चित्र जाणवत होते. या पार्श्वभूमीवरच या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढेल, असा अंदाज होता. विशेषत: मतदारांतील जागृती व प्रतिस्पर्ध्यांनी उडविलेल्या रणधुमाळीचे चित्रच त्यामागे कारणीभूत होते. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत सोशल मीडियाची भूमिकासुद्धा महत्त्वपूर्ण ठरली. सोशल मीडियानेच संपूर्ण निवडणुकीवर मोठा प्रभाव उमटविला. त्यामुळेच नव्या पिढीत निवडणुकीविषयी प्रचंड आस्था तीव्रतेने जाणवली. या निवडणुकीचे हे वैशिष्ट्यच ठरले. त्याचे प्रत्यंतरसुद्धा मतदानाच्या दिवशी तीव्रपणे जाणवले. १७ व २४ एप्रिल रोजी या दोन्ही मतदारसंघा मतदानाच्या टप्प्यात सकाळपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान केंद्र सर्वसामान्य मतदारांच्या गर्दीने फुलून गेले होते. शहरी व ग्रामीण भागात ठिकठिकाणी रांगा लागल्या होत्या. ज्येष्ठांपासून ते नव्या पिढीतील मतदारांनी स्वत: उत्स्फूर्तपणे मतदान करीत कुटुंबियांचे किंवा नात्या-गोत्यांसह शेजार्‍यापाजार्‍यांचे मतदान झाले की नाही, याची खात्री केली. परिणामी, दोन्ही मतदारसंघांत यावर्षी अभूतपूर्व मतदान झाले. जालना लोकसभेत भोकरदनपाठोपाठ पैठण, बदनापूर या विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी लक्षणीय व अभूतपूर्व ठरली. परभणी लोकसभेत घनसावंगी व परतूर विधानसभेतही लक्षणीय मतदान झाले. दोन्ही मतदारसंघात ठिकठिकाणी मतदारांनी केलेल्या उत्स्फूर्त मतदानाने राजकीय पक्षांसह उमेदवारसुद्धा अक्षरश: भारावून गेले. प्रतिस्पर्ध्यांनी केलेल्या विजयाच्या दाव्यांच्या पार्श्वभूमीवर आता १६ मे रोजी मतमोजणी होणार आहे, त्यातूनच प्रतिस्पर्ध्यांच्या दावे-प्रतिदाव्यांचा निर्णय लागणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी) एक दिवस भारनियमन थांबविण्याची मागणी आप-आपल्या मतदारसंघातील निकालापासून शेजारचे मतदारसंघ, विभाग, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील निकालांसंदर्भात शहरी व ग्रामीण भागात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळेच १६ मे रोजी सर्वसामान्य नागरिक टीव्हीसह अन्य माध्यमांतून मोठ्या प्रमाणावर निकाल जाणून घेणार, असे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर भारनियमन सुरू आहे. त्या भारनियमनाचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा तडाखा बसला आहे. रखरखत्या उन्हापाठोपाठ भारनियमनामुळे अंगाची लाही-लाही होत आहे. त्याही स्थितीत निवडणूकमय झालेल्या नागरिकांनी किमान १६ मे रोजी महावितरण कंपनीने भारनियमन थांबवून दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Web Title: Extremely passionate about election results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.