२०४ शाळांचे राज्यस्तरीय पथकाकडून बाह्य मूल्यमापन
By Admin | Updated: April 6, 2017 23:24 IST2017-04-06T23:23:35+5:302017-04-06T23:24:28+5:30
लातूर : जिल्हा परिषदेबरोबर खाजगी शाळांची गुणवत्ता वाढावी म्हणून केंद्र शासनाच्या वतीने शाळा सिद्धी उपक्रम सुरू करण्यात आला आहे़

२०४ शाळांचे राज्यस्तरीय पथकाकडून बाह्य मूल्यमापन
लातूर : जिल्हा परिषदेबरोबर खाजगी शाळांची गुणवत्ता वाढावी म्हणून केंद्र शासनाच्या वतीने शाळा सिद्धी उपक्रम सुरू करण्यात आला आहे़ या उपक्रमांतर्गत स्वयंमूल्यमापनात ‘अ’ दर्जा मिळालेल्या जिल्ह्यातील २०४ शाळांचे आता राज्यस्तरीय पथकाकडून बाह्य मूल्यमापन होणार आहे़ त्यामुळे या शाळांची धाकधूक वाढली आहे़ तर शासनाची आपल्यामागे कटकट नको म्हणून २३५१ शाळांनी ‘अ’ दर्जा वगळून अन्य दर्जा दिला आहे़
शहराबरोबर ग्रामीण भागातील गुणवत्तेचे प्रमाण वाढावे, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने शाळासिद्धी उपक्रम सुरू आहे़ या उपक्रमांतर्गत ७ गाभाघटक असून, ४६ मानके आहेत़ शाळेचे सामर्थ्यस्त्रोत, उपलब्धता, पर्याप्तता व उपयुक्तता तसेच अध्ययन, अध्यापन व मुल्यमापन, अध्ययनार्थींची प्रगती, संपादणुक व विकास, शिक्षक कामगिरी व व्यावसायिक विकासाचे व्यवस्थापन, शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन, समावेशन, आरोग्य व सुरक्षा, उत्पादक समाजाचा सहभाग या गाभाघटकांतर्गत तपासणी केली जाणार आहे़
जिल्ह्यात एकूण २ हजार ६४१ शाळा आहेत़ त्यापैकी २ हजार ५९८ शाळांनी आपले स्वयंमूल्यमापन पूर्ण करून त्याचा अहवाल शासनाकडे आॅनलाईन पद्धतीने सादर केला आहे़ दरम्यान, ४३ शाळांनी या उपक्रमास कुठलाही प्रतिसाद दिला नाही़ विशेष म्हणजे २ हजार ३५१ शाळांनी स्वयंमूल्यमापनात ‘अ’ दर्जा वगळता ब, क, ड असा दर्जा दिला आहे़ ‘अ’ दर्जाच्या २०४ शाळांचे आता राज्यस्तरीय पथकाकडून बाह्य मूल्यमापन होणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले़