अपेक्षा उंचावल्या...
By Admin | Updated: May 27, 2014 01:01 IST2014-05-27T00:44:59+5:302014-05-27T01:01:02+5:30
जालना : खा. रावसाहेब दानवे यांच्या रुपाने केंद्रीय मंत्रिमंडळात जालना जिल्ह्याला प्रथमच स्थान मिळाले आहे.

अपेक्षा उंचावल्या...
जालना : खा. रावसाहेब दानवे यांच्या रुपाने केंद्रीय मंत्रिमंडळात जालना जिल्ह्याला प्रथमच स्थान मिळाले आहे. जिल्हा निर्मितीच्या ३३ वर्षानंतर जिल्ह्याला हे स्थान मिळाल्याने जिल्हावासियांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. दानवे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे त्यांच्या कुटुंबियांसह समर्थकांना मोठा आनंद झाला आहे. चार दशकांच्या राजकीय वाटचालीतील २४ पैकी २३ निवडणुका जिंकत आपले वर्चस्व कायम राखणार्या खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून सलग चौथ्या वेळी २ लाखांवर मताधिक्याने विजयश्री पटकावली. मूळ भोकरदन तालुक्यातील पळसखेडा खुर्द येथील रहिवासी असलेले खा. दानवे यांनी १९७६ साली आपल्याच गावच्या सरपंचपदी विराजमान होत राजकीय क्षेत्रात पदार्पण केले. जवखेडा गण पं.स. सदस्य, १९८१ साली ते भोकरदन पं.स. सभापतीपदी विराजमान झाले. १९९० ते ९९ या कार्यकाळात ते भोकरदन विधानसभा मतदारसंघाचे दोन टर्म आमदार राहिले. १९९९ साली त्यांनी सर्वप्रथम लोकसभा निवडणूक लढविली. तेव्हापासून आजवर चारही लोकसभा निवडणुकांमधून त्यांनी विजय मिळविला. या व्यतिरिक्त रामेश्वर सहकारी साखर कारखाना, पंचायत राज समितीचे राज्याध्यक्ष तसेच इतर विविध पदे त्यांनी भूषविलेली आहेत. खा. दानवे यांच्या राजकीय आयुष्यातील १९८५ सालची विधानसभा निवडणूक अपवाद त्यांनी पराभव पत्करला नाही. खा. दानवे हे एक प्रदीर्घ अनुभवी व मुरब्बी राजकारणी म्हणून या जिल्ह्यात ओळखले गेले आहेत. जालना-खामगाव व सोलापूर जळगाव लोहमार्गाचा रेंगाळलेला प्रश्न मार्गी लागावा, अशी अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रासाठी गॅसलाईन, बदनापूरजवळ रेल्वेचा मालधक्का, जालना ते औरंगाबाद दुहेरी लोहमार्ग इत्यादी प्रश्न सुटावेत, अशीही अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्रिमंडळातील अन्य सहकार्यांच्या मदतीने विविध विकास कामे करावीत, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्टील, बियाणे या उद्योगांमुळे जालना जिल्ह्याचे नाव देशभर पसरलेले असले तरी उद्योग वाढीसाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया उद्योजकांमधून व्यक्त केली जात आहे. त्यासाठी विविध योजना राबविण्याची गरज असल्याचे उद्योजकांमधून सांगण्यात आले.(प्रतिनिधी) मिळालेल्या संधीचे सोने करू केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे ‘लोकमत’ शी बोलताना म्हणाले की, जालना जिल्ह्याला प्रथमच केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्यावर जी जबाबदारी टाकतील, ती यशस्वीपणे पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करू. राज्य व देशात चांगले काम करण्याची आपणास संधी दिल्याने या संधीचे आपण सोने करू, असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला. दानवे यांच्या केंद्रीय राज्यमंत्री पदाच्या रूपाने जालना जिल्ह्याला प्रथमच केंद्राच्या सत्तेत संधी मिळाली आहे. त्यामुळे दानवे यांच्याकडून सर्वसामान्यांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत.