महामारीत हजारो लोकांचे पोट भरले; अनुदान मिळत नसल्याने स्वत: उपाशी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:05 IST2021-06-29T04:05:01+5:302021-06-29T04:05:01+5:30

राम शिनगारे औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन थाळी योजनेने हजारो लोकांचे पाेट भरले आहे. औरंगाबाद ...

The epidemic filled the stomachs of thousands; Hunger for not getting grants! | महामारीत हजारो लोकांचे पोट भरले; अनुदान मिळत नसल्याने स्वत: उपाशी!

महामारीत हजारो लोकांचे पोट भरले; अनुदान मिळत नसल्याने स्वत: उपाशी!

राम शिनगारे

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन थाळी योजनेने हजारो लोकांचे पाेट भरले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात २४ केंद्रे सुरू असून, यात शहरात ११ आणि ग्रामीण भागात १३ केंद्रे आहेत. या केंद्रांवर दररोज ३३०० थाळ्यांचे वाटप गोरगरिबांना केले जाते. मात्र, या शिवभोजन थाळी चालकांचे अनुदान अडीच महिन्यांपासून थकले आहे. त्यामुळे त्यांना किराणा भरणेही अवघड झाले आहे.

राज्य शासनाने १ जानेवारी २०२० पासून राज्यात शिवभोजन थाळी ही योजना सुरू केली होती. सुरुवातीला शहरी आणि ग्रामीण भागात वेगवेगळे दर होते. गरजूंना केवळ १० रुपये द्यावे लागत होते. तर उर्वरित रक्कम ही शासन अनुदानाच्या स्वरुपात देत आहे. कोरोनाला सुरुवात झाल्यानंतर गरजूंना केवळ ५ रुपये आकारण्यात येत होते. कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर राज्य शासनाने गरजूंना १५ एप्रिल २०२१ पासून मोफत शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय घेतला. तसेच औरंगाबाद जिल्ह्यांतील शिवभोजन थाळी केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली. यानुसार जिल्ह्यातील २४ केंद्रांवर दिवसाला ३३०० थाळ्यांचे वाटप करण्यात येत आहे. ही केंद्रे सर्वसामान्य व्यक्ती चालवतात. त्यांना थाळी बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात किराणा लागतो. तो घेण्यासाठी शासनाने वेळेवर अनुदान देण्याची गरज असते. मात्र, शासनाने मागील अडीच महिन्यांपासून शिवथाळीचे अनुदान दिलेले नसल्याची माहिती समोर आली आहे. हे अनुदान तत्काळ मंजूर करण्याची मागणीही केंद्र चालकांनी केली आहे.

पॉईटंर

जिल्ह्यातील शिवभोजन थाळी केंद्रे : २४

१५ एप्रिलपासून मोफत लाभार्थ्यांची संख्या : ३,०२,४७३ (२७ जूनपर्यंत)

चौकट,

प्रती थाळी ४० रुपये अनुदान

राज्य शासनाने सुरुवातीला शहरी भागात ५० रुपये आणि ग्रामीण भागात ३५ रुपये प्रतिथाळी देण्याचा निर्णय घेतला होता. यात लाभार्थ्यांकडून १० रुपये घेऊन उर्वरित रक्कम अनुदान स्वरुपात शासन देणार होते. पुढे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शासनाने गरजूंना थाळी पूर्णपणे मोफत देण्याचा निर्णय घेतला. तर केंद्र चालकांना ४० रुपये सरासरी अनुदान देण्यात येत आहे. सुधारित आदेशानुसार घेतलेल्या अनुदानाच्या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. या थाळीमध्ये २ चपात्या, भाजी, वरण आणि भात असे पदार्थ देण्यात येतात.

चौकट,

अनुदान रखडले तरी थाळीवाटप सुरूच

मागील अडीच महिन्यांपासून शिवभोजन थाळीचे अनुदान केंद्रचालकांना मिळालेले नाही. जिल्ह्यात दररोज ३३०० थाळींचे वाटप केले जाते. यातून १ लाख ३२ हजार रुपये प्रतिदिन असे अनुदान द्यावे लागते. मात्र, ते मागील ७५ दिवसांपासून थकलेले आहे. अनुदान रखडले असले तरी केंद्र चालकांनी थाळ्यांचे वाटप थांबविलेले नसल्याची माहिती केंद्र चालकांनी दिली. सध्या स्वत: घरातून किराणा भरून थाळी वाटप करीत आहेत. मात्र, आणखी जास्त दिवस हे अनुदान न दिल्यास केंद्रचालकांची परिस्थिती डबघाईला येणार आहे.

प्रतिक्रिया

अनुदान थकले पण प्रतिक्रिया नको

मागील अडीच महिन्यांपासून अनुदान थकलेले आहे. ते मिळावे यासाठी सतत पाठपुरावा सुरू आहे. शासकीय दिरंगाईत ते अडकलेले असू शकते. त्यावर आम्ही बोललो तर अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे अनुदान थकले असले तरी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करायची नाही.

- एक थाळी केंद्र चालक, औरंगाबाद

----------------------------------------------

किराणा भरण्याची पंचाईत

शिवभोजन थाळीचे अनुदान अडीच महिन्यांपासून मिळालेले नाही. लवकरच मिळेल या आशेतून उसणेपासने पैसे घेऊन किराणा भरीत आहोत. तो कधीपर्यंत भरावा लागेल हे माहीत नाही. मात्र, आता इतरांकडून पैसे घेणेही कठीण झाले आहे. किराणा कसा भरावा ही पंचाईत झाली आहे.

- एक थाळी केंद्र चालक, औरंगाबाद

Web Title: The epidemic filled the stomachs of thousands; Hunger for not getting grants!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.