छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडी भागातील २२९ अतिक्रमणे महापालिकेने शुक्रवारी जमीनदोस्त केली. तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारी पुन्हा मोहीम जोमाने सुरू होणार असून, सकाळी ९:३० वाजता महापालिकेचे पथक या भागात दाखल होणार आहे. निवासी भागातील नागरिकांना स्वत:हून अतिक्रमणे काढून घेण्यासाठी अवधी देण्यात आला असला, तरी व्यावसायिक मालमत्तांना वेळ दिला जाणार नाही. मुकुंदवाडी येथील जिमखाना रस्त्यावरून कारवाईला सुरुवात होणार आहे.
जुन्या आणि नवीन शहर विकास आराखड्यानुसार जालना रोड ६० मीटर (१९६ फूट) दर्शविण्यात आला आहे. त्यात सर्व्हिस रोडचाही समावेश आहे. शुक्रवारी महापालिकेच्या नगररचना विभागाने मुकुंदवाडीत दुभाजकापासून डावीकडे ३० मीटर (९८ फूट) आणि उजवीकडे ३० मीटर टेप लावून मोजणी केली. ३० मीटर जागा संपल्यानंतर प्रत्येक मालमत्ताधारकाने आपल्या मालकीची ६ मीटर (१९ फूट) जागा रिक्त सोडणे बंधनकारक आहे. या जागेवर मालमत्ताधारकांचा ताबा असेल, पण तेथे त्याला बांधकाम करता येत नाही. ही जागा कायमस्वरूपी मोकळी ठेवावी लागते. त्यानुसारच महापालिकेने पाडापाडी केली. मंगळवारीसुद्धा महापालिका दुभाजकापासून ३० मीटर डावीकडे, ३० मीटर उजवीकडे टेप लावून कारवाई करणार असल्याचे अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख संतोष वाहुळे यांनी सांगितले. अतिक्रमणे पूर्णपणे काढल्यानंतर सर्व्हिस रोडचे नियोजनही मनपाने केले असल्याचे त्यांनी नमूद केले.
मोर्चामुळे मोहीम थांबविण्याची विनंतीसोमवारी सकाळी ११ वाजता क्रांती चौक येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर अन्याय, अत्याचारविरोधी कृती समितीतर्फे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवावा लागणार आहे. त्यामुळे सोमवारी अतिक्रमण हटाव मोहीम थांबवून मंगळवारी सुरू करावी, अशी विनंती पोलिसांनीच महापालिकेला रविवारी रात्री केली. पोलिसांची विनंती महापालिकेने मान्य केली.
एकाही मालमत्ताधारकाला नोटीस नाहीमहापालिकेने मागील दोन ते तीन दिवसांमध्ये एकाही मालमत्ताधारकाला नोटीस दिलेली नाही. भोंगे लावून जाहीर सूचना दिली. जाहीर प्रकटनाद्वारे यापूर्वीच स्वत: अतिक्रमणे काढून घ्यावीत, असे आवाहन केल्याचे वाहुळे यांनी सांगितले.
सकाळीच पथक दाखल होणारमहापालिकेचे पथक मंगळवारी सकाळी ९:३० वाजता मुकुंदवाडी भागात दाखल होईल. यावेळी अधिक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. या कारवाईला काही नागरिक, संघटना, पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून विरोध होत आहे. परिस्थितीचा अंदाज घेऊन पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पोलिस आयुक्त, मनपा प्रशासकांची चर्चाकारवाईपूर्वी पोलिस आयुक्त प्रवीण पवार आणि मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांची चर्चा होणार आहे. या चर्चेनंतर पुढील कारवाईला सुरुवात होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. साधारण मंगळवारी सकाळी ही चर्चा अपेक्षित आहे.
भोंगे लावून नागरिकांना सूचनामहापालिकेने मागील दोन दिवसात मुकुंदवाडी, चिकलठाणा, केंब्रिजपर्यंत मालमत्ताधारकांना भोंगे लावून पूर्वसूचना दिली आहे. ६० मीटरच्या आतील अतिक्रमणे स्वत:हून काढून घ्यावीत, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
इम्तियाज जलील यांची भेटएमआयएमचे माजी खा. इम्तियाज जलील यांनी रविवारी सायंकाळी मुकुंदवाडी भागाला भेट देऊन पाहणी केली. व्यापारी, नागरिकांसोबत चर्चा करून त्यांच्या व्यथा समजून घेतल्या. व्यापाऱ्यांनीही आपले दु:ख त्यांच्यासमोर मांडले.
कायदेशीर बाबी तपासूनच कारवाई : जी. श्रीकांतअतिक्रमण हटाव मोहीम राबविताना महापालिका सर्व कायदेशीर बाबी तपासूनच काम करीत आहे. जालना रोडवर रस्त्याच्या डावीकडे आणि उजवीकडे ३० मीटर जागा रिकामी अपेक्षित आहे. या जागेच्या आत कोणी अनधिकृत बांधकाम, टपरी, दुकान थाटले असेल तरच कारवाई केली जाईल. ३० मीटरपेक्षा जास्त पुढे जाऊन कारवाई केली जाणार नाही. ३० मीटरनंतरही सामासिक अंतर सोडणे बंधनकारक आहे. कोणाकडेही बांधकाम परवानगी नाही. सर्व अनधिकृत आहेत. मी संबधितांना बांधकाम परवानगी, गुंठेवारी केल्याचे प्रमाणपत्र दाखवावे, असे आवाहनही मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी केले.