कपातीच्या रकमेबाबत कर्मचार्यांची बेजबाबदारी
By Admin | Updated: May 24, 2014 00:48 IST2014-05-24T00:19:42+5:302014-05-24T00:48:06+5:30
हिंगोली : जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचार्यांच्या भविष्य निर्वाह निधी, जीवन बिमा निगम, कर्जाचे हफ्ते याबाबत

कपातीच्या रकमेबाबत कर्मचार्यांची बेजबाबदारी
हिंगोली : जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचार्यांच्या भविष्य निर्वाह निधी, जीवन बिमा निगम, कर्जाचे हफ्ते याबाबत कपात केल्या जाणार्या रकमेबाबत पंचायत समितीमधील कर्मचार्यांकडून बेजबाबदारीने काम केले जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे कपात केलेली रक्कम ३ महिन्यानंतर संबंधितांच्या खात्यावर जमा होत आहे. जिल्हा परिषदेंतर्गत येणार्या शिक्षक व इतर कर्मचार्यांची दरमहा भविष्य निर्वाह निधी, जीवन बिमा निगम, विविध बँका, पतसंस्था यांचे कर्जाचे हफ्ते याबाबतची रक्कम संंबंधित पंचायत समितीकडून कपात केली जाते. जिल्ह्यातील पाचही तालुक्यांतील पंचायत समित्यांमध्ये याबाबतचे काम पाहणार्या कर्मचार्याकडून केल्या जात असलेल्या दिरंगाईचा फटका संबंधित शिक्षक व कर्मचार्यांना बसत आहे. पंचायत समितीच्या आस्थापनेवर असलेल्या कर्मचार्यांची दरमहा कपातीची रक्कम त्यांच्या वेतनातून नियमितपणे कपात केली जाते. ही रक्कम तातडीने कपात केलेल्या कर्मचार्यांच्या भविष्य निर्वाह निधीत, बँका, पतसंस्थेच्या कर्जामध्ये तसेच एलआयसीचे हफ्ते भरण्याकरिता जमा होणे आवश्यक आहे; परंतु सद्य:स्थितीत एका महिन्यात कपात केलेली रक्कम जवळपास ३ महिन्यानंतर संबंधितांच्या खात्यामध्ये जमा होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उदाहरणच सांगायचे असेल तर जानेवारीमध्ये कपात झालेली रक्कम थेट मे महिन्यात संबंधितांच्या खात्यावर जमा होत आहे. खात्यावर उशिरा रक्कम जमा होत असल्याने संबंधितांना नाहक दंड सोसावा लागतो. शिवाय त्यांना ३ महिन्यांच्या व्याजालाही मुकावे लागते. त्यामुळे दिरंगाईने जमा केलेली रक्कम ३ महिने जाते तरी कुठे? असा सवाल उपस्थित होत आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाकडे विचारणा केली असता कपातीचे धनादेश व कपातपत्रक हे पंचायत समिती स्तरावरून वेळेवर मिळत नसल्याचे सांगण्यात येते. पंचायत समितीकडे याबाबत विचारणा केली असता, संबंधितांकडून टोलवाटोलवीची उत्तरे दिली जातात. पं.स.मध्ये या विभागाचे काम पाहणार्या कर्मचार्याच्या बेजबाबदारपणाचा फटका मात्र संबंधित शिक्षक व अन्य कर्मचार्यांना सहन करावा लागतो. याबाबत महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष जिरवणकर यांनी पं.स.कडे अनेकवेळा तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी आता याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)