थकित वेतनासाठी कर्मचाऱ्यांचा बंद

By Admin | Updated: January 13, 2015 00:13 IST2015-01-13T00:04:19+5:302015-01-13T00:13:49+5:30

लातूर : थकित वेतनासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी अचानक काम बंद आंदोलन केले. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंतही कर्मचाऱ्यांचा ठिय्या मनपात होता.

Employees' closure for tired wages | थकित वेतनासाठी कर्मचाऱ्यांचा बंद

थकित वेतनासाठी कर्मचाऱ्यांचा बंद


लातूर : थकित वेतनासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी अचानक काम बंद आंदोलन केले. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंतही कर्मचाऱ्यांचा ठिय्या मनपात होता. दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास कर्मचाऱ्यांनी मनपाचे दार बंद करून घोषणाबाजी करीत आंदोलन केले. सायंकाळी आयुक्तांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या तीन महिन्यांपासून थकित आहे. तर इतर विभागांतील कर्मचाऱ्यांचे वेतन दोन महिन्यांपासून थकित असल्याने कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करुन थकित वेतन तात्काळ देण्याची मागणी केली. महापालिकेच्या प्रवेशद्वारावर सफाई कर्मचाऱ्यांनी जवळपास दोन ते अडीच तास ठिय्या मांडला. महापालिकेत असलेल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ३५० कर्मचारी सफाई विभागात कार्यरत आहेत. मागील तीन महिन्यांचे कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्याने उपासमारीची वेळ आली आहे. चौथा महिना सुरू झाला तरी अद्यापही वेतन मिळाले नसल्याने गैरसोय होत असल्याची ओरड कर्मचाऱ्यांनी केली. वेतन वेळेवर मिळत नाही. शिवाय, मनपा प्रशासनाने वेतनातून कपात करून घेतलेले बँकांचे हप्ते, एलआयसीचे हप्ते वेळेत न भरल्यामुळे बँकांच्या नोटिसा कर्मचाऱ्यांना मिळत आहेत. जोपर्यंत मनपा प्रशासन थकित वेतन देणार नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका मराठवाडा श्रमिक संघटनेचे अध्यक्ष रामदास शिंदे यांनी मांडली.
सहाव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम अद्याप अनेक कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली नाही. त्यात बहुतांश सफाई विभागातील कर्मचाऱ्यांचाच समावेश आहे. सोसायटीचे हप्ते दोन वर्षांपासून भरण्यात आले नाहीत. परिणामी, कर्जाचा डोंगर वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिका प्रशासनाने कचरा उचलण्यासाठी लावलेले ट्रॅक्टर व काही खाजगी कर्मचारी यांचे वेतन वेळेवर करते. मात्र कर्मचाऱ्यांचे वेतन थकवून त्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात आहे. आयुक्तांनी महिनाभरापूर्वी वेतन तात्काळ देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते आश्वासन त्यांनी पाळले नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. सफाई विभागात ८३ कर्मचारी रोजंदारीवर आहेत. त्यांचाही पगार थकित आहे. शिवाय, सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन वेळेवर मिळत नाही. त्यामुळे विविध आजाराने ग्रासलेल्या पेन्शनधारकांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने आजार बळावत चालले आहेत. वारसाला कामावर घेण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र ते पाळले जात नाही. शिवाय, पेन्शनची रक्कम दिली जात नसल्याने उपाशीपोटी जगण्याची वेळ आल्याची ओरडही काही पेन्शनधारकांनी केली. (प्रतिनिधी)
मनपा आयुक्त सुधाकर तेलंग म्हणाले, सफाई विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन तीन महिन्यांपासून थकित आहे. तर इतर विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन दोन महिन्यांपासून थकले आहे.
४शासनाकडून ४ कोटी २५ लाख रुपये दुसऱ्या टप्प्यात अनुदान आले आहे. वेतनाची प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे मंगळवारी कर्मचाऱ्यांचे वेतन दिले जाईल. आंदोलनकर्त्या सफाई कर्मचाऱ्यांना मंगळवारी वेतन देण्यात येईल, असे लेखी आश्वासन आपण दिले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन मागे घेतले.

Web Title: Employees' closure for tired wages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.