कर्मचाऱ्यांच्या संपात अधिकाऱ्यांची उडी
By Admin | Updated: August 6, 2014 02:37 IST2014-08-06T02:16:53+5:302014-08-06T02:37:53+5:30
सिल्लोड : या संपामुळे तहसील कार्यालयात शुकशुकाट दिसून येत आहे.

कर्मचाऱ्यांच्या संपात अधिकाऱ्यांची उडी
सिल्लोड : या संपामुळे तहसील कार्यालयात शुकशुकाट दिसून येत आहे. तंत्रनिकेतन, मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी रहिवासी, उत्पन्न, नॉन क्रिमिनल आदी प्रमाणपत्रांची विद्यार्थ्यांना गरज आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तहसील कार्यालयातून अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. यामुळे नागरिकांची तहसील कार्यालयात नेहमी वर्दळ असते. महसूल कर्मचारी पदोन्नती मिळणे, महसूल सहायक पद निर्माण करणे, अनुकंपावर जागा भरणे, शिपाई व कोतवालांना पदोन्नती मिळणे, कोतवालांच्या वारसांचा कोतवालांच्या जागेवर समावेश करणे आदी मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. यामुळे विद्यार्थी व नागरिकांना आल्या पावली परत जावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड व मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सोयगाव : महसूल कर्मचाऱ्यांच्या लेखणीबंद आंदोलनामुळे तालुक्याच्या ठिकाणी कामे घेऊन येणाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. येथे मंगळवारी बाजार असल्याने सोबतीला कामे घेऊन आलेल्यांना रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले. महसूल कर्मचाऱ्यांच्या या संपाचा परिणाम राज्यभर दिसून येत आहे. सोयगावातही अनेक कामे खोळंबली आहेत.
याविषयी महसूल संघटनेचे सचिव विजय येवले यांच्याशी संपर्क साधला असता आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय काम सुरू होणार नाही, असे त्यांनी सांगितले.
गंगापूर : गंगापूर तहसील कार्यालयातील महसूल कर्मचारी संपावर गेले असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांची विविध कागदपत्रे काढण्यासाठी फरपट होत असून, शासनाने पर्यायी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
गंगापूर तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून ग्रामीण भागातील जनतेची कामे खोळंबली आहेत. विशेषत: विद्यार्थ्यांना या प्रकारचा जास्त त्रास होत आहे. सद्य:स्थितीत विविध शाळा, महाविद्यालय, इंजिनिअरिंग आदी ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी जात प्रमाणपत्र, नॉनक्रिमिलेअर, उत्पन्न, रहिवासी, वय अधिवास, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र काढून घेण्यासाठी दरदिवशी तहसील कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहे.
पैठण : या संपामुळे वेळेच्या आत आवश्यक असलेले प्रमाणपत्र मिळत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना मनाजोगे प्रवेश मिळाले नाहीत. बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रवेशावेळी केवळ प्रमाणपत्र सादर केले नाही म्हणून खुल्या प्रवर्गासाठी प्रवेश घ्यावा लागला, तर ज्यांची खुल्या वर्गात प्रवेश घेण्याची क्षमता नाही त्यांना प्रवेशापासून मुकावे लागले. पर्यायी व्यवस्था करून तारांबळ थांबविण्याची मागणी होत आहे. तालुक्यात अजूनही टँकर सुरू असल्याने हा संप असाच सुरू राहिल्यास काही दिवसांनी टँकरचे नियोजनही बिघडू शकते.