आठ लाख भाविकांनी वेचला चुना
By Admin | Updated: April 23, 2016 23:52 IST2016-04-23T23:45:19+5:302016-04-23T23:52:25+5:30
येरमाळा : येथील श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमा यात्रेस शुक्रवारी प्रारंभ झाला असून, शनिवारी यात्रेतील महत्त्वपूर्ण असणारा चुना वेचण्याचा सोहळा पारंपारिक पध्दतीने मोठ्या उत्साहात पार पडला.

आठ लाख भाविकांनी वेचला चुना
येरमाळा : येथील श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमा यात्रेस शुक्रवारी प्रारंभ झाला असून, शनिवारी यात्रेतील महत्त्वपूर्ण असणारा चुना वेचण्याचा सोहळा पारंपारिक पध्दतीने मोठ्या उत्साहात पार पडला. झांज, हलगी व संबळाच्या गजरात ‘आई राजा उदो उदोऽऽ' चा घोष करत राज्यभरातून जवळपास आठ लाख भाविक या सोहळ्यात दाखल झाले होते. तळपत्या उन्हाच्या काहिलीत तब्बल चार-पाच किलोमिटरच्या परिघात हा भक्तीचा मळा फुलला होता. आगामी पाच दिवस हा यात्रोत्सव सुरू राहणार आहे.
कळंब तालुक्यातील येरमळा येथे देवी येडेश्वरीचे जागृत देवस्थान आहे. दरवर्षी चैत्र महिन्यातील पोर्णिमेला येडेश्वरी देवीची पाच दिवसीय यात्रा भरते. यानिमित्त विविध पारंपारिक धार्मिक उपक्रम विधीवत पार पाडले जातात. शुक्रवारी यात्रेच्या पहिल्या दिवशी मंदिरात छबीना मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडला. यानंतर शनिवारी यात्रेच्या मुख्य दिवशी सकाळी आठ वाजता मंदिरात देवीची पूजा व महाआरती करण्यात आली. यानंतर देवीच्या पालखीचे मंदिरातून गावाकडे प्रस्थान झाले. सवाद्य निघालेली पालखी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास गावात दाखल झाली. याठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. जागोजागी, चौकाचौकात रांगोळीचा आरास करण्यात आला होता. सकाळी साडेदहाच्या सुमारास पालखीसोहळा चुन्याच्या रानात दाखल झाला. येथे पारंपारिक पध्दतीने चुना वेचण्याचा कार्यक्रम पार पडला. यानंतर दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान देवीची पालखी आमराईत दाखल झाली.
दरम्यान, येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमा यात्रेत शनिवारी पार पडलेल्या चुना वेचण्याच्या कार्यक्रमाला खूप मान आहे. यामध्ये आसपासच्या जमिनीत असलेल्या चुन्याचे खडे वेचून पालखीजवळ टाकले जातात. जमा झालेला चुना पाचव्या दिवशीच्या घुगरी महाप्रसादाच्या कार्यक्रमावेळी भाजून याचा पोथरा मंदिराला व गाभाऱ्याला दिला जातो. गेल्या अनेक वषार्पासून सुरू असलेली ही परंपरा येरमळा यात्रेत मोठ्या श्रद्धेने पार पाडली जाते. शनिवारी या कार्यक्रमास राज्याच्या काना कोपऱ्यातून जवळपास आठ लाख भाविक दाखल झाले होते. झांज, संबंळ, हलगीच्या तालावर ठेका धरत, आई येडाईचा उदो उदो असा जयघोष करीत लाखो भाविक मोठ्या भक्तीभावाने पालखी समवेत येवून या सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी आ. राणा जगजितसिंह पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमूख सुधीर पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे, उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, सरपंच विकास बारकूल, मानकरी अमोल पाटील, यशवंत पाटील, मंदिर संस्थानचे समाधान बेदरे, बापूसाहेब बेदरे, संजय बारकूल, संजय निचळे यांनीही उपस्थिती लावली होती. (वार्ताहर)
कडक उन्हाळ्यात देवीची चैत्री यात्रा भरल्यामुळे येथे आलेल्या लाखो भाविकांची तहान भागविण्याचे शिवधनुष्य प्रशासन कसे पलवणार, असा प्रश्न पडला होता. परंतु, सुयोग्य नियोजन, सामाजिक, राजकीय आणि उद्योग क्षेत्रातून पुढे आलेले मदतीचे हात यामुळे तीव्र दुष्काळातही यात्रा स्थळी पाण्याचा सुकाळ दिसून आला. आ. राणाजगजितसिंह पाटील यांनीही याठिकाणी भाविकासाठी थंड पाण्याची चांगली सोय केली होती.