सव्वातीनशे जणांचे शैक्षणिक पुनर्वसन
By Admin | Updated: November 19, 2015 00:22 IST2015-11-19T00:11:04+5:302015-11-19T00:22:47+5:30
उस्मानाबाद : मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर व बीड जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यातील

सव्वातीनशे जणांचे शैक्षणिक पुनर्वसन
उस्मानाबाद : मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर व बीड जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ३२५ पाल्यांचे संपूर्ण शैक्षणिक पुनर्वसन करण्याची जबाबदारी भारतीय जैन संघटनेने घेतली आहे. संघटनेच्या माध्यमातून पिढी घडविण्याचे काम केले जात असल्याची माहिती भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांनी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विजयकुमार बेदमुथा, अभय मुनोत यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना शांतीलाल मुथा म्हणाले की, नापीकी व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यातील ४२२ शेतकरी कुटुंबाची भारतीय जैन संघटनेने भेट घेऊन माहिती घेतली. आत्महत्याग्रस्त कुटुंबात सध्या कर्त्या महिला असल्याने संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही पाहणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या कुटुंबात पाचवी ते बारावीत शिक्षण घेणारी १९३ मुले व १३२ मुली आढळून आल्या. भारतीय जैन संघटनेच्या वतीने या विद्यार्थ्यांना पुणे (वाघोली) मोफत शिक्षण, निवास, कपडे, भोजन, आरोग्य, शैक्षणिक साहित्य व मानव शास्त्रीय समुपदेशन आदी सुविधा दिल्या जातील. यापूर्वी शिक्षणासाठी फक्त मुलांनाच नेले जात असे पण आता मुलींचीही जबाबदारी उचलल्याचे शांतीलाल मुथा यांनी यावेळी सांगितले. प्रारंभी पाहुण्यांचा परिचय रणजित दुरुगकर यांनी करून दिला. यावेळी कांचनमाला संगवे, गुलचंद व्यवहारे यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)