शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतली तासिका
By Admin | Updated: December 22, 2015 23:56 IST2015-12-22T23:33:37+5:302015-12-22T23:56:36+5:30
औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी गुणवत्तेचा प्रश्न छेडला.

शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतली तासिका
औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी गुणवत्तेचा प्रश्न छेडला. तेव्हा शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी सभागृहात अत्यंत धाडसाने अर्धा तास निवेदन करून राबविण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रमांचा वृत्तांन्तच सादर केला. गुणवत्ता नाही हे मान्य आहे; पण अलीकडे शिक्षकांनी स्वत:ला झोकून देऊन अनेक शाळा ‘आयएसओ’ केल्या. अनेक शाळांमध्ये रचनावाद शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून गुणवत्ता वाढविण्यावर भर दिल्याचे सांगितले. आपला विभाग कात टाकत आहे, असे सांगत देशमुख यांनी काही क्षणातच सभागृहातील सदस्यांची मने जिंकली, हे विशेष!
झाले असे की, जि.प. सदस्य डॉ. सुनील शिंदे, दीपक राजपूत, मनाजी मिसाळ, पुष्पा जाधव यांनी काही खाजगी स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणाचा दाखला देत जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना लिहिताही येत नाही व वाचता येत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला.
तेव्हा सभागृहात बसलेले शिक्षणाधिकारी तात्काळ उठले व मी आपला अर्धा तास घेणार आहे, असे सांगत निवेदनाला सुरुवात केली. ते म्हणाले की, आपला आरोप मला मान्य आहे; पण सद्य:स्थिती आता तशी राहिलेली नाही.
महाराष्ट्र शासनाने प्रामुख्याने जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम हाती घेतला असून जूनपासून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे.
या कार्यक्रमांतर्गत ज्ञानरचनावाद शिक्षण पद्धती स्वीकारण्यात आली आहे.
प्रत्यक्ष अनुभूतीद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची ही पद्धत कुमठे बिटमध्ये यशस्वी झाली. तेथे आतापर्यंत १२०० शिक्षकांनी भेट देऊन कशा पद्धतीने शिक्षण दिले जाते, त्याचे अवलोकन केले. ३१ डिसेंबरपर्यंत आणखी १६०० शिक्षक तेथे भेट देणार आहेत.