आयात शुल्क वाढताच खाद्यतेल वधारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 23:41 IST2017-11-18T23:41:28+5:302017-11-18T23:41:44+5:30
सोयाबीनला हमीभाव मिळावा यासाठी केंद्र सरकारने खाद्येतलांवरील आयात शुल्कात वाढ केली. त्याचा त्वरित परिणाम शनिवारी स्थानिक बाजारपेठेत दिसून आला.

आयात शुल्क वाढताच खाद्यतेल वधारले
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सोयाबीनला हमीभाव मिळावा यासाठी केंद्र सरकारने खाद्येतलांवरील आयात शुल्कात वाढ केली. त्याचा त्वरित परिणाम शनिवारी स्थानिक बाजारपेठेत दिसून आला. सोयाबीनसह सरकी, पामतेलात लिटरमागे ५ रुपयांनी भाव वधारले. मात्र, नवीन आवक वाढल्याने शेंगदाणा तेलाचे भाव लिटरमागे १० रुपयांनी कमी झाले.
सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी किमतीत व्यापारी सोयाबीन खरेदी करीत आहेत. नाफेडमार्फत हमीभावात सोयाबीन खरेदीला सुरुवात केली; पण त्याचा त्वरित परिणाम दिसून आला नाही. अखेर केंद्र सरकारने विदेशातून येणाºया खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढ केली. यात आयात शुल्कात प्रत्येकी १५ टक्के वाढ करण्यात आली. यामुळे आता क्रुड पामतेलावर ३० टक्के, रिफाइंड पामतेलावर ४० टक्के, क्रुड सूर्यफूल तेलावर २५ टक्के, रिफाइंड सूर्यफुलावर ३५ टक्के, क्रुड सोयाबीन तेलावर ३० टक्के, रिफाइंड सोयाबीन तेलावर ३५ टक्क्यांपर्यंत आयात शुल्क जाऊन पोहोचले आहे. याचा त्वरित परिणाम स्थानिक बाजारपेठेवर दिसून आला. होलसेल विक्रीत क्विंटलमागे ५०० रुपयांनी खाद्यतेलात भाववाढ झाली. शहरात ७२०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होणारे सोयाबीन तेल शनिवारी ७७०० रुपये विक्री झाले. तसेच सरकी तेल ७४०० रुपये, तर पामतेल ६९०० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाले. किरकोळ विक्रीतही लिटरमागे ५ रुपये वाढून खाद्यतेल विक्री करण्यात येऊ लागले आहे. सोयाबीन तेल ७५ रुपये, सरकी तेल ७४ तर पामतेल ६९ रुपये प्रतिलिटर विक्री होत आहे. खाद्यतेलाचे व्यापारी जगन्नाथ बसैये यांनी सांगितले की, नवीन करडीची आवक मार्च-एप्रिल महिन्यात सुरू होईल. करडीची आवक कमी झाल्याने करडी तेलाचे भावही १ हजार रुपयांनी वधारून शनिवारी १३५०० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाले. किरकोळ विक्रीतही १० रुपये वाढून करडी तेल १३० ते १३५ रुपये प्रतिलिटर विक्री होत आहे; पण या भाववाढीला शेंगदाणा तेल अपवाद राहिले. कारण, नवीन शेंगदाण्याची आवक होत असल्याने या तेलात १० रुपयांनी भाव घटून ११० ते ११५ रुपये प्रतिलिटर विकत आहे. लग्नसराईत सोयाबीन व सरकी तेलाला मागणी असते. खाद्यतेलाच्या भावात लिटरमागे १ रुपयांचा फरक असल्याने सोयाबीन जास्त विकल्या जाईल.