पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर ईडीची धाड
By | Updated: December 4, 2020 04:09 IST2020-12-04T04:09:55+5:302020-12-04T04:09:55+5:30
औरंगाबाद : मनी लाँड्रिंगच्या संशयावरून अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने गुरुवारी सकाळी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) औरंगाबादेतील राज्य कार्यालयावर ...

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर ईडीची धाड
औरंगाबाद : मनी लाँड्रिंगच्या संशयावरून अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने गुरुवारी सकाळी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) औरंगाबादेतील राज्य कार्यालयावर धाड टाकली. पथकाने सुमारे अडीच तास कार्यालयाची झडती घेतली. त्यानंतर दोन पदाधिकाऱ्यांची चौकशी व आर्थिक व्यवहारासंबंधी कागदपत्रे जप्त करून पथक परतले. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेचे राज्य कार्यालय औरंगाबादमधील जुना बायजीपुरा येथे आहे. या कार्यालयावर ईडीच्या पथकाने पोलिसांना सोबत घेऊन गुरुवारी सकाळी १० वाजता छापा टाकला. तेव्हा कार्यालयात जिल्हा कमिटीचे सदस्य कलीम उपस्थित होते. संस्थेचे जिल्हाध्यक्ष इरफान मिली यांना पथकातील अधिकारी ईश्वर यांनी कॉल करून कार्यालयात बोलावून घेतले. यानंतर इरफान मिली आणि कलीम यांच्याकडून अधिकाऱ्यांनी संस्थेच्या कामकाजाची माहिती घेतली. उच्चशिक्षणासाठी मुस्लिम विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यासाठी पैसा कोठून येतो? संस्थेचे देणगीदार कोण आहेत? आणि या कार्यालयातून राज्यभरातील किती कार्यालयांवर नियंत्रण ठेवले जाते, यासह अन्य मुद्द्यांवर चौकशी केली. यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयातील आर्थिक व्यवहारासंबंधी पासबुक, बँक स्टेटमेंट आदी कागदपत्रे, तसेच संस्थेच्या विविध उपक्रमांबद्दल असलेली कागदपत्रे जप्त केली. यानंतर पथकाने कलीम यांना शहरातील केंद्रीय जीएसटी कार्यालयात नेऊन त्यांची चौकशी केली. पंचनाम्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी कलीम यांना सोडून दिले.
======
चौकट
कार्यालयाबाहेर समर्थकांची गर्दी
अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने पीएफआय कार्यालयावर धाड टाकण्यासाठी येताना सोबत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आणले होते. अचानक ईडीची धाड पडल्याचे कळताच कार्यालयाबाहेर पीएफआय समर्थकांनी गर्दी केली होती.
============
कार्यालय ते रोशनगेट काढला मोर्चा
पथक गेल्यावर ईडीने क्लीन चिट दिल्याचा दावा पीएफआयचे पदाधिकारी कलीम यांनी केला. यानंतर पीएफआयचे पदाधिकारी आणि समर्थकांनी जुना बायजीपुरा ते रोशनगेट असा मोर्चा काढला.
====
कोट
दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाहून इतरत्र लक्ष वळविण्यासाठी केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर धाड टाकली. आम्ही हाथरस प्रकरण, दिल्ली दंगल आणि एनआरसीविरुद्ध जाहीर आंदोलन पुकारल्याने आमचा आवाज बंद करण्यासाठी ईडीचा वापर सरकार करीत आहे.
-इरफान मिली, जिल्हाध्यक्ष, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, औरंगाबाद