कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे बेहाल
By Admin | Updated: December 18, 2015 23:29 IST2015-12-18T23:18:51+5:302015-12-18T23:29:48+5:30
हिंगोली : एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे दुसऱ्या दिवशीही बस बंद होत्या. त्यामुळे जवळपास १८ हजार ४०० प्रवाशांची गैरसोय होऊन आगाराचे ५ लाखांचे नुकसान झाले.

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे बेहाल
हिंगोली : एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे दुसऱ्या दिवशीही बस बंद होत्या. त्यामुळे जवळपास १८ हजार ४०० प्रवाशांची गैरसोय होऊन आगाराचे ५ लाखांचे नुकसान झाले. मागण्या मान्य केल्याने संप मागे घेतल्याची माहिती कर्मचाऱ्यांना मिळताच फटाके फोडून जल्लोष साजरा केला.
परिवहनमधील चालक, वाहक, प्रशासक, यांत्रिकी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दुसऱ्या दिवशी प्रवाशांनी बसस्थानकाकडे ढुंकूनही पाहिले नाही. मात्र ज्या प्रवाशांना बाहेरगावी जाणे गरजेचे होते त्यांनी खाजगी वाहनांचा आधार घेतला. हिंगोली आगारातून विविध मार्गे नियमित ५९ गाड्या २१ हजार ९९५ किमी जातात. त्यापासून आगाराला दिवसाकाठी साडेचार ते पाच लाखांचे उत्पन्न मिळते. परंतु उत्पन्न तर सोडाच साधी विद्यार्थ्यांची गैरसोयदेखील टाळणे शक्य झाले नाही. आज विद्यार्थी खाजगी वाहनाने शाळेत येताना दिसत होते. हिंगोली आगारातून लांब पल्ल्याच्या एकूण पाच बसेस धावतात. यामध्ये पुणेमार्गे २, हैदराबाद १, सोलापूर १, मुंबई १ या बसेसचा समावेश आहे. त्या न धावल्याने २५० प्रवाशांची तारांबळ उडाली. दुसऱ्या दिवशीच्या संपात कर्मचाऱ्यांची संख्या वाढली होती. यात ३५० कर्मचारी सहभागी झाले होते. हिंगोलीतील एकूण सात संघटना सहभागी झाल्या होत्या.
वसमतमध्ये हाल
वसमत: एसटी कर्मचाऱ्यांनी पगार वाढीसाठी पुकारलेला संप दुसऱ्या दिवशीही कायम राहिल्याने प्रवाशांचे हाल झाले. संप मिटल्याची घोषणा झाल्यानंतर ४ वाजल्यापासून बच धावण्यास सुरूवात झाली. येथून दररोज ५९ बस धावतात. दररोज उत्पन्न ५ ते साडेपाच लाख आहे. मात्र ते सतत दोन दिवस बुडाले.